तलावांच्या दुरुस्तीमुळे सिंचन वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:35 IST2021-05-16T04:35:36+5:302021-05-16T04:35:36+5:30

सिरोंचा : तालुक्यातील मामा तलावांच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. येथील बहुतांश तलाव जीर्णावस्थेत पोहोचले होते. त्यामुळे ...

Irrigation increased due to repair of ponds | तलावांच्या दुरुस्तीमुळे सिंचन वाढले

तलावांच्या दुरुस्तीमुळे सिंचन वाढले

सिरोंचा : तालुक्यातील मामा तलावांच्या माध्यमातून धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध होते. येथील बहुतांश तलाव जीर्णावस्थेत पोहोचले होते. त्यामुळे त्यांची पाणी साठवण क्षमता कमी झाली होती. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मामा तलाव व बोड्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. मामा तलावांची दुरुस्ती झाल्याने सिंचनाचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे.

पोर्ला येथील विश्रामगृहाची दुरवस्था

पोर्ला : तालुक्यातील पोर्ला येथे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे विश्रामगृह बांधण्यात आले. परंतु या विश्रामगृहाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने विश्रामगृह दुरवस्थेत आहे. पोर्ला हे गडचिरोली तालुक्यातील मध्यवर्ती गाव आहे. येथील विश्रामगृह अतिशय जुने आहे. या विश्रामगृहाच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे.

स्वच्छतागृहांअभावी पसरली दुर्गंधी

आरमोरी : शहरात सार्वजनिक मूत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मूत्रीघर तयार केले आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

सावरगाव परिसराच्या विकासाकडे दुर्लक्ष

धानोरा : छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या सावरगाव परिसरातील गावांचा विकास रखडला आहे. हा परिसर आदिवासीबहुल व नक्षल प्रभावित आहे. या ठिकाणी नेमण्यात आलेले कर्मचारी नियमित कर्तव्य बजावत नाहीत. अनेक नागरिकांना शासकीय योजनांची माहिती नाही, त्याबाबत जनजागृती करण्याची मागणी हाेत आहे.

वाकडी-बोरी मार्गावर खड्डे कायम

लखमापूर बोरी : चामोर्शी तालुक्यातील अनेक ठिकाणच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाकडी-लखमापूर बोरी मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून या रस्त्यांची अवस्था बकाल झाली आहे. वारंवार तक्रार करूनही दुरुस्तीच्या कामाकडे कानाडोळा केला आहे.

देसाईगंजात गंजलेले, जीर्ण खांब बदलवा

देसाईगंज : नगर परिषद क्षेत्रात अनेक लोखंडी खांब वाकले आहेत. काही खांब खालच्या बाजूने जीर्ण झाले आहेत. सदर खांब कधीही कोसळण्याचा धोका आहे. सदर खांब बदलविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कठड्यांअभावी अपघाताची शक्यता

चामोर्शी : गडचिरोली मार्गावरील पोहर नदीत चिचडोह बॅरेजचे पाणी साचले आहे. या नदीवरील पूल अरुंद आहे. तसेच या पुलावार लोखंडी कठडे उभारण्यात आले नाहीत. त्यामुळे एखादे वाहन कोसळून धोका होण्याची शक्यता आहे. या मार्गावरील वर्दळ पाहता पोहर नदीवर कठडे लावावेत.

कन्नमवार नगरात डासांचा प्रादुर्भाव

गडचिरोली : शहराच्या कन्नमवार नगरातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात

गडचिरोली : गोकुलनगर लगतच्या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम काही वर्षांपूर्वी प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आले होते. मात्र सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाले नाही. त्यामुळे या तलावात आता अतिक्रमण वाढले असून अस्वच्छता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सदर तलाव सौंदर्यीकरणाचा प्रश्न थंडबस्त्यात आहे.

गावांमध्ये निस्तार डेपो देण्याची मागणी

कुरखेडा : तालुक्यातील अनेक गावांमध्ये निस्तार डेपो नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने गावांत त्वरित निस्तार डेपो देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कुरखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. मात्र कुरखेडा येथे निस्तार डेपो नाही. परिणामी नागरिकांना जळाऊ लाकूड उपलब्ध होण्यास अडचण निर्माण होत आहे.

शेतजमिनी होत आहेत अकृषक

एटापल्ली : शेतजमिनी अकृषक करून तेथे प्लॉट पाडण्यात येत आहेत. त्यामुळे जमिनीचे भाव वाढले आहे. शहरातील काही ठरावीक मंडळी जमीन खरेदी करण्यासाठी शेतमालकावर दबाव टाकत आहेत. चांगल्या जमिनी व्यावसायिकांच्या घशात जात आहेत. गडचिरोली शहरासह देसाईगंज, आरमोरी, चामोशी येथे शेतजमिनीचे भूखंड तयार केले जात आहेत.

तलाठ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करा

एटापल्ली : तलाठ्यांना मुख्यालयाची सक्ती करावी, अशी मागणी दुर्गम भागातील नागरिकांनी केली आहे. जिल्हाभरातील तलाठी साजाच्या ठिकाणी ये-जा करतात. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांची दाखल्यासाठी पायपीट होत आहे.

चार्मोशी मार्गावर शेड उभारण्याकडे दुर्लक्ष

गडचिरोली : राज्य परिवहन महामंडळाच्या गडचिरोली आगाराचा चार्मोशी मार्गावर थांबा देण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी शेड नसल्याने प्रवासी भरउन्हात बसची प्रतीक्षा करीत असतात. सदर बसथांब्यावरून अनेक प्रवासी चार्मोशी, अहेरीकडे ये-जा करतात. त्यामुळे गडचिरोली आगाराने चार्मोशी मार्गावर प्रवाशांसाठी शेड उभारावी, अशी मागणी होत आहे.

पिशव्यांमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात

गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

जिल्ह्यात रोजगाराभिमुख तंत्रशिक्षणाचा बट्ट्याबोळ

देसाईगंज : कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शासनाने औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर तंत्रशिक्षण संस्था निर्माण केल्या असल्या तरी, यातील अभ्यासक्रम पूर्णपणे कालबाह्य झाला आहे. त्याचबरोबर यातील अनेक पदे रिक्त आहेत.

जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करा

कुरखेडा : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेली वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्राअभावी अनेक पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी होत आहे.

खुल्या जागांची दैनावस्था कायम

गडचिरोली : गडचिरोली नगरपालिका क्षेत्रात अनेक वॉर्डांमध्ये खुल्या जागा आहेत. मात्र काही मोजक्याच जागांना संरक्षण भिंत उभारण्यात आली आहे. अनेक ठिकाणच्या खुल्या जागांना संरक्षण भिंत नाही. तसेच या ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते.

ग्रामीण भागातही पशुधन घटले

एटापल्ली : यंत्राचा वापर वाढल्याने पशुधनाचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे पशुधन घटत चालले आहे. पूर्वीच्या तुलनेत आता केवळ २५ टक्के पशुधन गावात शिल्लक असल्याचे दिसून येते. ही अतिशय गंभीर बाब आहे.

Web Title: Irrigation increased due to repair of ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.