कमलापूर येथे असुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:37 IST2021-02-24T04:37:34+5:302021-02-24T04:37:34+5:30

धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाईलधारक त्रस्त ...

Inconvenience at Kamalapur | कमलापूर येथे असुविधा

कमलापूर येथे असुविधा

धानोरा : तालुक्यातील चातगाव येथील मोबाईल टॉवर व्यवस्थित काम करीत नसल्याने कव्हरेज मिळत नाही. त्यामुळे चातगाव परिसरातील मोबाईलधारक त्रस्त झाले असून टॉवर दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. येथील बिघाडाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

कमलापुरात असुविधा

कमलापूर : अहेरी तालुक्यातील महत्त्वपूर्ण गाव म्हणून ओळख असलेल्या कमलापूर येथे सोयीसुविधांची भरमार असणे जनतेला अपेक्षित होते. परंतु कित्येक वर्षांपासून गावातील नागरिकांना मूलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्थानिक प्रशासनाच्या वतीने वारंवार पाठपुरावा केला जाताे.

पशुधन सांभाळताना पशुपालक त्रस्त

अहेरी : अहेरी उपविभागासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात पशुधनाची संख्या मोठी आहे. मात्र बऱ्याचशा पशुपालकांकडे हाडकुळ्या गायी व बैल आहेत. या पशुधनाची व्यवस्था सांभाळताना शेतकऱ्यांना त्रास होत आहे. अनेक शेतकरी असे पशुधन विकण्याच्या तयारीत आहेत.

अनेक पांदण रस्ते अतिक्रमणात

जोगीसाखरा : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. जोगीसाखरा परिसरातील पळसगाव, रामपूर, कासवी आदी गावातील पांदण रस्ते अतिक्रमणात आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत.

अपंग विवाह अनुदान योजनेबाबत अनभिज्ञता

कुरुड : शासनाच्या वतीने अपंग युवक-युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जि.प. समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने अनेक अपंग युवक-युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.

फवारणीची मागणी

आलापल्ली : येथील अनेक वॉर्डातील नाल्यांचा गाळ उपसा करण्याकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नाल्यांमधून दुर्गंधी पसरत आहे. परिणामी वॉर्डात डासांची उत्पत्ती वाढली आहे. डासामुळे शहरात आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

निवासस्थान सक्तीचे करा

अहेरी : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभाल अभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक तसेच वनविभागाचे कर्मचारी तालुका मुख्यालयी राहत आहेत.

रस्ता बांधकाम करा

चामोर्शी : चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील अनेक गावांसाठी रस्त्याचे बांधकाम करण्यात आले नसल्याने नागरिकांना पायवाटेनेच ये-जा करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक दुर्गम गावांमध्ये अद्यापही शासनाच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. पावसाळ्यात अनेक रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य असते.

वाहने सडताहेत

गडचिरोली : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेले वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रांअभावी अनेक पोलीस ठाण्यांमध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

निवासस्थाने निरुपयाेगी

आलापल्ली : शासनाने लाखो रुपये खर्च करून येथे कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधून घेतली. मात्र शासकीय कर्मचारी या निवासस्थानांना ‘खो’ देत असल्याने कर्मचाऱ्यांना देखभालीअभावी ही निवासस्थाने ओसाड झाली आहेत. येथील अनेक वन कर्मचाऱ्यांच्या इमारती ओसाड दिसून येतात.

लघु सिंचन इमारत जीर्ण

अहेरी : उपविभागातील सहा तालुक्यांचा कारभार पाहणाऱ्या अहेरी येथील उपविभागीय लघु सिंचन जलसंधारण कार्यालयाला शासनाने इमारत बांधून दिली नाही. त्यामुळे या कार्यालयाचा कारभार भाड्याच्या खोलीतूनच चालविला जात आहे. याशिवाय अनेक कार्यालये दुसऱ्या इमारतींमधून चालविली जात आहेत.

रेपनपल्लीचा पूल जीर्ण

कमलापूर : कमलापूर ते रेपनपल्ली या तीन किमीच्या रस्त्यावरील डांबर जागोजागी उखडले आहे. आतील दगड व गिट्टी बाहेर आली आहे. तसेच या रस्त्यावर असलेले पूलसुद्धा जीर्ण अवस्थेत आहे. सदर पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे या पुलावरून पावसाळ्यात पाणी राहते. येथे नवीन पुलाची गरज आहे.

डासांचा प्रादुर्भाव वाढला

गडचिरोली : शहरातील कॅम्प एरियातील अनेक नाल्या तुंबल्या असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिसरात डासांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कॅम्प एरियात नियमित डास प्रतिबंधक फवारणी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

नियमांचे उल्लंघन

देसाईगंज : गावातील अंतर्गत रस्त्यांवर उघड्यावर खुलेआम खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे़. हल्ली उघड्यावर खाद्यपदार्थांची सर्रास विक्री होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ दुकानदारांवर कारवाईची मागणी आहे. सातत्याने मागणी करूनही कारवाई केली नाही. प्रशासन सुस्त असल्याचे दिसून येते.

Web Title: Inconvenience at Kamalapur