सुगंधी तंबाखूची परप्रांतातून तस्करी सुरू अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: May 8, 2014 23:45 IST2014-05-08T23:45:20+5:302014-05-08T23:45:20+5:30
गडचिरोली : वर्षभरापूर्वी राज्य सरकारने गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थावर महाराष्टÑात बंदी घातली आहे.

सुगंधी तंबाखूची परप्रांतातून तस्करी सुरू अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष
गडचिरोलीतही मोठा व्यापार
गडचिरोली : वर्षभरापूर्वी राज्य सरकारने गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थावर महाराष्टÑात बंदी घातली आहे. मात्र आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात चोरट्या मार्गाने सुगंधीत तंबाखुची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस प्रशासनही या संदर्भात कुठलीही कारवाई करीत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने वर्षभरापूर्वी गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र गडचिरोलीत कुठेही ही बंदी असल्याचे दिसून येत नाही. छत्तीसगड व आंध्रप्रदेश राज्याच्या सीमेला लागून जिल्ह्याचे अनेक तालुके आहेत. छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव, पाखांजूर, धानोरा मार्ग गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी केली जात आहे.
महाराष्ट्रात गुटखा व तंबाखुजन्य पदार्थावर बंदी नसतांना या मालाचे होलसेल विक्रेते होतेच. शासनाने बंदी घातल्यावरही याच विक्रेत्यांमार्फत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपर्यात हा माल राजरोसपणे पोहचविला जात आहे. ठराविक दुकानदार गडचिरोली शहरात अशा मंडळींकडे मालासाठी येरझार्या घालत असल्याचे चित्र आहे. छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यात कुठेही सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थावर बंदी नाही. तेथून कोरची, धानोरा, कुरखेडा आदी भागात माल पाठविला जातो व ग्रामीण भागात तो जुन्याच वितरकांमार्फत पुरवठा केला जातो. त्यामुळे शासनाच्या बंदीला अर्थच उरलेला नाही. उलट शासनाने बंदी केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्यांची कमाई जोमाने वाढली आहे. कारवाई न करता यांचे अभय असल्याने या मालाची तस्करी व विक्री करणारे मजबुतपणे कामात लागून आहेत. शासनाचा १२ टक्के वॅटकरही बुडविला जात आहे. गेल्या काही महिन्यात अन्न, औषध प्रशासनाकडून कारवाईचे एकही प्रकरण झालेले नाही. यावरून अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाई विषयीही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशी परिस्थिती ठेवण्यापेक्षा राज्यातील घातलेली बंदी उठवून या पदार्थाची विक्री खुली करावी, अशी स्थिती आहेत, अशी प्रतिक्रीया सर्वत्र उमटली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)