घरकुलाच्या आशेने झोपडीत वास्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:24 IST2018-09-29T00:24:07+5:302018-09-29T00:24:52+5:30
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गडचिरोली शहरात सुमारे १ हजार २०० घरकूल मंजूर करण्यात आले आहे. घरकूल मिळेल, या आशेने नागरिकांनी घर बांधले नाही. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही घरकुलासाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे घर बांधण्याचे स्वप्न आणखी दूर जात आहे.

घरकुलाच्या आशेने झोपडीत वास्तव्य
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत गडचिरोली शहरात सुमारे १ हजार २०० घरकूल मंजूर करण्यात आले आहे. घरकूल मिळेल, या आशेने नागरिकांनी घर बांधले नाही. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही घरकुलासाठी निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे घर बांधण्याचे स्वप्न आणखी दूर जात आहे.
शहरातील नागरिकांना पहिल्यांदाच घरकूल योजनेचा लाभ दिला जात आहे. गडचिरोली शहरातील विवेकानंदनगर, गोकुलनगर व फुले वार्डातील सुमारे १ हजार २०० घरांना मंजुरी प्रदान करण्यात आली. घरकुलांना मंजुरी मिळाल्यानंतर काही महिन्यातच निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा बाळगली जात होती. घरकूल मंजूर झाल्यानंतर काही दिवसातच अनुदान मिळले, या अपेक्षेवर शहरातील नागरिक होते. मात्र आता घरकूल मंजूर होऊन वर्षभराचा कालावधी उलटल चालला आहे.
घरकूल मिळण्याच्या आशेवर नागरिक झोपडीतच वास्तव्य करीत आहेत. काही नागरिकांच्या झोपड्या कोसळण्याचीही शक्यता आहे. लाभार्थी नगर परिषदेत येऊन घरकूलाच्या निधीबाबत विचारणा करीत आहेत. मात्र कर्मचारीही निरूत्तर होत आहेत.
अपुरा निधी मिळाल्यास पंचाईत
२०२२ पर्यंत सर्वांना घर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्र शासनामार्फत देण्यात आले असले तरी या योजनेसाठी निधीची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सुमारे १८ हजार नागरिक घरकुलाच्या प्रतीक्षेत आहेत. या लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात आली आहे. मात्र दरवर्षी शासन केवळ एक हजार ते दोन हजार घरकुलांना मंजुरी प्रदान करते. गडचिरोली शहरातील १ हजार २०० घरांना मंजुरी प्रदान करण्यात आली असली तरी तेवढा निधी एकाचवेळी उपलब्ध होईल, याची शक्यता कमीच आहे. अपुरा निधी उपलब्ध झाल्यास यादीमध्ये सर्वप्रथम ज्या व्यक्तीचे नाव आहे, त्याला घरकूल उपलब्ध होईल. शेवटच्या लाभार्थ्यांना मात्र आणखी काही वर्ष प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.