मध निर्मितीतून सक्षमीकरणाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 05:00 IST2020-03-31T05:00:00+5:302020-03-31T05:00:50+5:30
सालमारा या पेसा गावातील अशिक्षित, गरीब, गरजू नऊ बचत गटातील विविध जाती, धर्मातील महिलांना तीन लाख रूपये तीन वर्षाकरिता देण्यात आले. यातून महिलांनी मधनिर्मिती केंद्राची स्थापना केली. याकरिता २० पेट्या खरेदी केल्या. मधमाशांचे पोळे आणून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक महिलांकडे सोपविण्यात आली. मधमाशांना पुष्परस मिळत नसल्याने सध्या बेसनपाणी व साखर खाद्य म्हणून दिल्या जात आहे.

मध निर्मितीतून सक्षमीकरणाकडे वाटचाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जोगीसाखरा : पुरेशी शैक्षणिक आणि आर्थिक सामर्थ्य नसलेले सालमारा या पेसा गावातील संपूर्ण नऊ बचत गटाच्या महिलांनी मध निर्मिती केंद्र सुरू केले. या केंद्राच्या माध्यमातून त्यांची महिला सक्षमीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. पुरूषांप्रमाणे बाजारपेठेतील देवाणघेणाव व व्यावसायिक संधी जोगीसाखरा गट ग्राम पंचायतीने त्यांना उपलब्ध करून दिली होती. या संधीचे सोने महिलांनी केले आहे.
सालमारा या पेसा गावातील अशिक्षित, गरीब, गरजू नऊ बचत गटातील विविध जाती, धर्मातील महिलांना तीन लाख रूपये तीन वर्षाकरिता देण्यात आले. यातून महिलांनी मधनिर्मिती केंद्राची स्थापना केली. याकरिता २० पेट्या खरेदी केल्या. मधमाशांचे पोळे आणून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक महिलांकडे सोपविण्यात आली. मधमाशांना पुष्परस मिळत नसल्याने सध्या बेसनपाणी व साखर खाद्य म्हणून दिल्या जात आहे.
विशेष म्हणजे मोकळ्या जागेत उन्हातच मधमाशाच्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. उष्णतेमुळे मधमाशा जागा सोडू शकतात. बऱ्याच माशांचा मृत्यू झाला आहे. मध व्यवसाय, गावाबाहेर जंगलात उभारला असल्याने भविष्यात अस्वलासारखे रानटी प्राणी मधाचे पोळे फस्त करण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने महिला सक्षमीकरणासाठी महिलांना मध संकलन केंद्राच्या माध्यमातून व्यवसाय उपलब्ध करून दिला. मात्र कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी असल्याने योग्य मार्गदर्शन मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मध निर्मिती प्रक्रियेतील संपूर्ण प्रशिक्षण देऊन उद्योगासंदर्भात महिलांचे मनोबल वाढविण्याची एकांत गरज आहे.
महिला सक्षमीकरणासाठी तीन लाख रुपये खर्च करून सालमारा येथे मध निर्मिती केंद्र उभारले आहे. या माध्यमातून महिलांना व्यवसाय मिळाला आहे. परंतु सध्या कोरोेना विषाणूमुळे संचारबंदी असल्याने मध निर्मिती केंद्राकडे दुर्लक्ष होत आहे. मधाविषयी संपूर्ण माहिती देणे अवगत झाले आहे. परंतु या व्यवसायाच्या माध्यमातून महिलांना उद्योगाच्या प्रवाहात आणण्याचा उद्देश आहे.
- बी.टी.जवंजालकर, ग्रामसेवक, गट ग्रा.पं.जोगीसाखरा