रामाळा मिश्र रोपवनातील निम्मे रोपे नष्ट
By Admin | Updated: February 12, 2015 01:08 IST2015-02-12T01:08:29+5:302015-02-12T01:08:29+5:30
ज्या ठिकाणी जंगलाची घनता जास्त आहे, त्या ठिकाणचे झुडुपी झाडे तोडून मानवीकृत मिश्र रोपवन तयार करण्याच्या उपक्रमामुळे जंगलाचे संवर्धन होणे आवश्यक होते.

रामाळा मिश्र रोपवनातील निम्मे रोपे नष्ट
लोकमत विशेष
प्रदीप बोडणे वैरागड
ज्या ठिकाणी जंगलाची घनता जास्त आहे, त्या ठिकाणचे झुडुपी झाडे तोडून मानवीकृत मिश्र रोपवन तयार करण्याच्या उपक्रमामुळे जंगलाचे संवर्धन होणे आवश्यक होते. मात्र पर्यावरणाची हानीच झाली. वडसा वन विभागांतर्गत येणाऱ्या रामाळा मिश्र रोप वनातील निम्मे रोपे वर्षभरात नष्ट झाली. या मिश्र रोपवनात जी झाडे सध्या उभी आहेत, त्या आरक्षीत जंगलात रोज मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. मात्र याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
शासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत प्रशासनाच्या वतीने जिल्हाभरात अनेक ठिकाणी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम दरवर्षी राबविल्या जातो. या कामात शासनाचा लाखो रूपयांचा खर्चही झाला आहे. मात्र लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनाकडे वन विभाग तसेच संबंधित सर्व विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने लावलेली रोप मोठी होण्यापूर्वीच नष्ट होत असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार वडसा वन विभागांतर्गत आरमोरी वनपरिक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या रामाळा मिश्र वनरोपवनात दिसून येत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत रामाळा बिटात कक्ष क्र. ४० मधील १५ हेक्टर वनक्षेत्रात सन २०१२-१३ या वर्षात १६ हजार ५०० रोपांची लागवड करण्यात आली. मात्र या रोपांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष झाल्याने या मिश्र रोपवनातील निम्मे रोप नष्ट झाल्याची खात्रीलायक माहिती आहे. कोणतेही रोपवन तयार करण्याचा पाच वर्ष कालावधीचा कार्यक्रम होतो. पहिल्या वर्षात रोपांची लागवड करणे, नंतर ज्या ठिकाणी रोप पाण्याअभावी, गुरांच्या खुराने तसेच वनवे लागल्याने किंवा इतर कारणांनी नष्ट होतात. त्या ठिकाणी नवीन रोपांची लागवड केली जाते. रामाळा येथील मिश्र रोपवनात २०१२ च्या ८ आॅगस्टपासून वृक्ष लागवडीचे काम सुरू झाले. तीन वर्षात या रोपवनातील निम्मे वृक्ष नष्ट झाली, हे विशेष.
मिश्ररोप वन क्षेत्र आरक्षित असताना देखील जळाऊ लाकडांची विक्री करणारे लोक या जंगलात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड करीत आहेत. मात्र या वृक्षतोडीकडे वन विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
वन विभागाने लाखो रूपये खर्च करून तयार केलेल्या अनेक मानवीकृत रोपवाटिका व मिश्र रोपवनाची अशीच स्थिती आहे. नैसर्गिकरित्या घनदाट जंगले विरळ करून त्यात नव्याने रोपे लावली जातात. यामुळे नैसर्गिकरित्या उभे असलेले जंगलातील झाडे नष्ट होतात. याशिवाय मानवीकृत लावलेले रोपही संवर्धनाअभावी नष्ट होत आहेत. नियोजनाचा अभाव, देखभाल व संवर्धनाकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यातील अनेक भागातील जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत. शासनाची शतकोटी वृक्ष लागवड योजना फसली असून असाच प्रकार मिश्र रोपवनाच्या बाबतीत घडत आहे. यामुळे वन्यजीव व निसर्ग प्रेमींनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे.