पालकमंत्री संपूर्ण जिल्ह्याचे की, केवळ अहेरीचे
By Admin | Updated: January 8, 2015 22:54 IST2015-01-08T22:54:21+5:302015-01-08T22:54:21+5:30
राज्य सरकारने नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची वर्णी लागली आहे.

पालकमंत्री संपूर्ण जिल्ह्याचे की, केवळ अहेरीचे
गडचिरोली : राज्य सरकारने नागपूर हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांची वर्णी लागली आहे. मात्र पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्यात सर्व भागात कार्यक्रमांना जाण्याऐवजी केवळ आपल्याच अहेरी विधानसभा क्षेत्रात कार्यक्रमांना हजेरी लावत असल्याने पालकमंत्री अहेरीचे की, गडचिरोलीचे अशी चर्चा प्रशासकीय वर्तुळातही सुरू झाली आहे.
२०१० मध्ये आर. आर. पाटील यांच्यासारख्या जबाबदार मंत्र्यांकडे गडचिरोलीच्या पालकमंत्री पदाची धुरा होती. महिन्याला दोनदा ना. पाटील गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत होते. २०१० ते २०१४ या कालावधीत ना. पाटील यांनी साडेतीनशेवर दौरे गडचिरोली जिल्ह्यात केले. त्यामुळे त्यांची सामान्य माणसाप्रती असलेली आस्था यातून दिसून येत होती. विकासाच्या निधीतही त्यांनी जिल्हा विकास योजनेत प्रचंड मोठी वाढ केली. आता भाजपसेना सरकारच्या काळात अम्ब्रीशराव महाराज यांच्याकडे पालकमंत्री पदाची धुरा आली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनापासून अम्ब्रीशराव महाराजांनी गडचिरोलीत केवळ तीनवेळा हजेरी लावली. पालकमंत्री होण्यापूर्वी २४ नोव्हेंबर रोजी ते मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी आले. त्यानंतर गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांच्यासोबत केवळ पोलीस मुख्यालयाच्या कार्यक्रमासाठी आले. त्यानंतर नागपूर अधिवेशन संपल्यानंतर स्वत:च्या सत्कार कार्यक्रमासाठी पालकमंत्री गडचिरोलीत आले. याचवेळी त्यांनी देसाईगंज, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी, घोट या भागाचा धावता दौरा केला. गडचिरोलीचे स्थानिक पालकमंत्री असताना त्यांनी येथे विविध विभागाच्या आढावा बैठका घेण्याची अपेक्षा लोकांना होती.
अकाली पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे अनेक ठिकाणी धान्य भिजले. परंतु पालकमंत्री शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठीही आले नाही. केवळ अहेरी भागातच आपला दौरा करून आपल्या मतदारसंघावरच लक्ष केंद्रीत करण्याचे काम पालकमंत्री करीत आहेत. सिरोंचा येथे पालकमंत्र्यांची मिरवणुक काढण्यात आली. दवाखान्यासमोर सायलेंट झोन असतांना जोरदार ढोल ताशे बदडण्यात आले. ज्या क्रीडा संमेलनाचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन आहे. तेथेही तास ते दीड तास विलंबाने ते पोहोचतात, असे लोकप्रतिनिधीही सांगत आहेत. त्यामुळे पालकमंत्र्यांविषयी सध्या प्रचंड चर्चा जनमाणसात आहे. या पालकमंत्र्यांकडून विकासाची फारशी अपेक्षा नाही, अशी प्रतिक्रीया जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (जिल्हा प्रतिनिधी)