पडिक जमिनीवर बहरली हिरवी वनराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 05:00 AM2020-08-15T05:00:00+5:302020-08-15T05:00:38+5:30

वाढत्या लोकसंख्येमुळे वृक्षतोड व वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भविष्यात यामुळे जंगले संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. देसाईगंज तालुक्यात आजमितीस शेकडो हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करुन अनेक ठिकाणची वन जमीन व्यावसायिक प्रयोजनार्थ वापरण्यात येऊ लागल्याचे चित्र दिसून येताच वन विभागाने खबरदारी घेतली.

Green forest flourishing on paddy land | पडिक जमिनीवर बहरली हिरवी वनराई

पडिक जमिनीवर बहरली हिरवी वनराई

Next
ठळक मुद्देवन विभागाचे नियोजन : नैनपूर, शिवराजपूर, विहीरगाव, कसारी, पिंपळगाव व एकलपुरातील झुडपी जंगल

पुरूषोत्तम भागडकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : तालुक्यात वन विभागाची शेकडो हेक्टर वन जमीन ओसाड होती. या जागेवर अतिक्रमणधारकांची करडी नजर होती. मात्र वनविभागाने अशा पडिक जागेवर वृक्षारोपण करण्याचे ठरविले. त्यानुसार गत पाच ते सात वर्षापूर्वी या जागेवर वृक्षारोपण केल्याने सध्या पडिक जमिनीवर हिरवी वनराई बहरली आहे.
देसाईगंज तालुक्यात नैनपूर शिवराजपूर, विहीरगाव, कसारी, पिंपळगाव (हलबी) एकलपूर टोला परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगलाची जमीन आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे वृक्षतोड व वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भविष्यात यामुळे जंगले संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. देसाईगंज तालुक्यात आजमितीस शेकडो हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण करुन अनेक ठिकाणची वन जमीन व्यावसायिक प्रयोजनार्थ वापरण्यात येऊ लागल्याचे चित्र दिसून येताच वन विभागाने खबरदारी घेतली. अनेक वर्षांपासून काही लोकांनी अतिक्रमण केले असताना त्या लोकांना डावलून महसूल व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन बनावट कागदेपत्रांच्या आधारे वनहक्क पट्टे प्राप्त केल्याची प्रकरणे आहेत. याबाबत तक्रारीही झाल्या आहेत. असे प्रकार तालुक्यात घडल्याने यापुढे झुडपी जंगलाच्या पडिक जागेवर अतिक्रमण होऊ नये, यासाठी वडसा वन विभागाने पुढाकार घेऊन शतकोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत वृक्षारोपण केले होते. याची प्रचिती आता समोर आली असून पडिक जागेवर हिरवीगार वनराई डोलत आहे.

हडपलेली जमीन परत घेण्याची गरज
देसाईगंज तालुक्यातील तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पडिक जमिनीवर वृक्ष लागवड केल्याने सध्या शेकडो हेक्टर जमिनीवर घनदाट जंगल आकार घेत आहे. उपलब्ध पाणीसाठा व गर्द हिवराईमुळे येथे प्राण्यांचाही वावर वाढला आहे. नैसर्गिक अन्नसाखळी टिकवून ठेवण्यास हे जंगल उपयोगी येणार आहे. याची मौलिक मदत होणार आहे. पारंपारिकरित्या अतिक्रमण करून उपजीविका करणाऱ्या लोकांना डावलल्याची अनेक प्रकरणे आहेत. अशा बनावट दस्तावेज सादर करून वन विभागाची शेकडो एकर जागा हडपणाऱ्या तालुक्यातील अनेक अतिक्रमणधारकांवर कारवाई होणे गरजेचे आहे. वन विभागाने अशाचप्रकारे जागा ताब्यात घेऊन या जागेवर वृक्ष लागवड करावी, अशी मागणी वनप्रेमींकडून केली जात आहे.

Web Title: Green forest flourishing on paddy land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.