ग्रामसभेची परवानगी आवश्यक नाही
By Admin | Updated: June 9, 2014 23:38 IST2014-06-09T23:38:48+5:302014-06-09T23:38:48+5:30
वैरागड येथील आदिवासी जंगल कामगार संस्थेला सन २0१३-१४ या वर्षात जैतपूर कुप क्रमांक १ व २ मध्ये कुपकटाईचे काम मिळाले आहे. वनविभागाकडून जंगल कामगार संस्थेला रितसर ताबा मिळाल्यानंतर

ग्रामसभेची परवानगी आवश्यक नाही
वन विभागाचा खुलासा : कुपकटाईस मनाई न करण्याची संस्थेची मागणी
वैरागड : वैरागड येथील आदिवासी जंगल कामगार संस्थेला सन २0१३-१४ या वर्षात जैतपूर कुप क्रमांक १ व २ मध्ये कुपकटाईचे काम मिळाले आहे. वनविभागाकडून जंगल कामगार संस्थेला रितसर ताबा मिळाल्यानंतर संस्थेच्या सभासदांनी कुपकटाईचे काम सुरू केले. मात्र शंकरपूर येथील ग्रामस्थांनी वनहक्क कायद्याचा आधार घेऊन कुपकटाईचे काम बंद पाडले. इमारती व जळाऊ वनोपजावर गावकर्यांचा हक्क राहत नाही. यामुळे कुपकटाईच्या कामासाठी ग्रामसभेची परवानगी घेणे आवश्यक नाही, असा खुलासा वडसाच्या वनपरिक्षेत्राधिकार्यांनी केला आहे.
जंगल कामगार संस्थेच्या कुप कटाईच्या कामात अडथळा आणणे चुकीचे व नियमबाह्य आहे, असेही वनविभागाने म्हटले आहे. ग्रामस्थांनी वनहक्क कायद्याचा बाहु करून संस्थेच्या कुपकटाईच्या कामात अडथळा आणू नये, अशी मागणी जंकासचे अध्यक्ष माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी व संस्थेच्या संचालकांनी केली आहे.
वनविभागाने इमारत व जळाऊ वनउपजावर गावकर्यांचा हक्क राहत नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे कुप कटाईच्या कामाला अटकाव करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही डॉ. रामकृष्ण मडावी यांनी म्हटले आहे.
शासन व वनविभागाचे प्रतिनिधी म्हणून जंगल कामगार संस्था काम करतात. वनविभागाने दिलेल्या आदेशानुसार नियम व अटी पाळून जंकास कार्य करतात. जी झाडे अनावश्यक आहेत, त्याबाबत वनविभागाकडून ठरवून देण्यात येऊन कुपकटाईच्या कामाला मंजुरी देण्यात येते. त्यानंतरच कुपकटाई करण्यात येते. शंकरपूर येथील संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी जैतपूर येथे थांबविलेले कुप कटाईचे काम ही अयोग्य कृती आहे, असेही जंकासचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण मडावी यांनी म्हटले आहे.
वनविभागाने या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी वैरागड येथील जंगल कामगार संस्थेचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण मडावी, संचालक सुखदेव बोडणे, पितांबर लांजेवार, तुकाराम जुमनाके, इश्वर मडावी, तुळशीराम चौके, सुमन वट्टी यांनी केली आहे.
वनउपजाच्या मालकीवरून वैरागड येथील जंगल कामगार संस्था व गावकर्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. यामुळे कुपकटाईचे काम थांबले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)