ग्राम पंचायतींचे नामांतर
By Admin | Updated: May 2, 2015 01:33 IST2015-05-02T01:33:47+5:302015-05-02T01:33:47+5:30
तालुकास्तरावरील ग्राम पंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतरण करण्याला मंजुरी मिळताच चामोर्शी, आरमोरी व सिरोंचा ग्राम पंचायत ..

ग्राम पंचायतींचे नामांतर
चामोर्शी/आरमोरी/सिरोंचा : तालुकास्तरावरील ग्राम पंचायतीचे नगर पंचायतमध्ये रूपांतरण करण्याला मंजुरी मिळताच चामोर्शी, आरमोरी व सिरोंचा ग्राम पंचायत प्रशासनाने इमारतीवरील ग्राम पंचायतीच्या ऐवजी नगर पंचायत असे नामांतरण केले आहे.
एक वर्षापूर्वी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यात तालुकास्तरावर नगर पंचायती स्थापन करण्यात येत होत्या. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायती स्थापन करण्याबाबत शासनाने ग्राम पंचायत निवडणुकीपर्यंत ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे नगर पंचायत स्थापन होणार की नाही याबद्दल शंका, कुशंका उपस्थित केल्या जात होत्या. अशातच ग्राम पंचायत निवडणुकीच्या अगदी आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत नगर पंचायत स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या निवडणुका ऐन वेळेवर रद्द कराव्या लागल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली. त्याचवेळी नगर पंचायत स्थापन झाल्याचा आनंदही नागरिकांना होत होता. नगर पंचायतीला शासन जास्तीचे अनुदान देणार असल्याने या शहरांचा विकास होण्यास फार मोठी मदत होणार आहे.
२३ एप्रिल रोजी नगर पंचायतीला मंजुरी मिळाल्यानंतर ग्राम पंचायत प्रशासनाने सर्वप्रथम ग्राम पंचायतीच्या इमारतीवर लिहिलेले नाव बदलविण्याची प्रक्रिया सुरू केली. याअंतर्गत चामोर्शी, आरमोरी व सिरोंचा येथील इमारतींवर आता नगर पंचायत असे नाव लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर नगर पंचायतीची स्थापना २०१५ रोजी करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. नगर पंचायत स्थापन झाल्यानंतर ग्राम विकास अधिकाऱ्यांना हटवून तहसीलदारांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहे. याच तहसीलदारांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नगर पंचायतीचे प्रथम ध्वजारोहण करण्याचा मान मिळाला. चामोर्शी नगर पंचायतीत तहसीलदार वैद्य यांनी ध्वजारोहण केले. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते. (लोकमत न्युज नेटवर्क)