ग्रा.पं.कडे सात कोटींचे वीज बिल थकीत

By Admin | Updated: September 9, 2014 23:30 IST2014-09-09T23:30:24+5:302014-09-09T23:30:24+5:30

वेळेवर न होणाऱ्या करवसुलीमुळे बहुतांश ग्रामपंचायती उधारवाडीवरच प्रशासनाचा गाडा हाकत असून पथदिव्यांचे वीज बिलही भरण्यासाठी पैसे राहत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ७ कोटी १९ लाख

Gram Panchayat has got excess electricity bill of seven crore rupees | ग्रा.पं.कडे सात कोटींचे वीज बिल थकीत

ग्रा.पं.कडे सात कोटींचे वीज बिल थकीत

गडचिरोली : वेळेवर न होणाऱ्या करवसुलीमुळे बहुतांश ग्रामपंचायती उधारवाडीवरच प्रशासनाचा गाडा हाकत असून पथदिव्यांचे वीज बिलही भरण्यासाठी पैसे राहत नसल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे ७ कोटी १९ लाख ५८ हजार ३७३ रूपये एवढे वीज बिल थकीत राहिले आहे. वीज वितरण कंपनीकडून याबाबत वेळोवेळी विचारणा करून सुद्धा वीज बिलाचा भरणा करण्यात आलेला नाही.
ग्रामपंचायतीला केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनांसाठी दरवर्षी लाखो रूपयांचा निधी प्राप्त होतो. मात्र सदर निधी संबंधित विकास कामावरच खर्च करण्याचे बंधन आहे. त्यामुळे सदर निधीचा उपयोग ग्रामपंचायत प्रशासन गावाच्या दैनंदिन गरजांसाठी वापरू शकत नाही. गृहकराच्या रूपात नागरिकांकडून गोळा झालेला पैसा पथदिव्यांचे वीज बिल भरणे, हातपंप दुरूस्ती करणे, गावातील नाल्यांचा उपसा करून गावात स्वच्छता राखणे आदी बाबींवर खर्च करता येतो. मात्र बहुतांश नागरिक गृहकराचा भरणा वेळेवर करत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन अडचणीत येते. जिल्ह्यातील आजही काही ग्रामपंचायतींची ५० टक्केपेक्षा कमी करवसुली झाली आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडे पैसे नसल्याने दैनंदिन खर्च कसा करावा, असा प्रश्न ग्रामपंचायत प्रशासनासमोर निर्माण होतो. ग्रामपंचायतीच्या सेवेबाबत नेहमीच बोटे मोडणारे नागरिक गृहकर भरण्यास मात्र समोर येत नाही.
एका ग्रामपंचायतीमध्ये चार ते पाच गावे समाविष्ट आहेत. प्रत्येक गावासाठी स्वतंत्र वीज कनेक्शन घेण्यात आला आहे. त्याचबरोबर काही ग्रामपंचायतींनाही स्वतंत्र वीज कनेक्शन आहे. असे एकूण जिल्हाभरातील १४१० वीज कनेक्शनचे ७ कोटी १९ लाख ५८ हजार ३७३ रूपयांचे वीज बिल थकले आहे. एका ग्रामपंचायतीकडे २० ते ३० हजार रूपयांपर्यंतचे वीज बिल थकीत आहेत. या ग्रामपंचायतींना चालू बिल भरण्याची सक्ती वीज वितरण कंपनीने केली आहे. त्यामुळे अनेक ग्रामपंचायती चालू वीजबिल भरून आपली पत सांभाळत आहेत. थकीत वीज बिल भरण्याबाबत वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र ग्रामपंचायतीकडे पैसाच नसल्याने थकीत बिल देण्यास टाळाटाळ करीत आहेत.
गावातील पथदिवे एक दिवसही बंद राहिल्यास गावातील नागरिक सरपंच, ग्रामसेवक यांच्या नावाने ओरडतात. मात्र ग्रामपंचायतीकडे पैसेच नसल्याने पथदिवे लागणार कसे, असे शहाणपण एकाही नागरिकाला सूचत नाही. भविष्यात एखादी ग्रामपंचायतीला चालू बिलाचाही भरणा करणे अशक्य झाल्यास त्यावेळी मात्र गावातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडीत होण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही. त्यामुळे नागरिकांनी गृहकर भरणे आवश्यक झाले आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Gram Panchayat has got excess electricity bill of seven crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.