ग्राम पंचायती निधी खर्च करण्यात नापास
By Admin | Updated: April 5, 2015 01:54 IST2015-04-05T01:54:35+5:302015-04-05T01:54:35+5:30
गडचिरोली जिल्ह्यात ४६७ ग्राम पंचायती आहेत. यांना मोठ्या प्रमाणावर निधी शासनाकडून देण्यात येत आहे.

ग्राम पंचायती निधी खर्च करण्यात नापास
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात ४६७ ग्राम पंचायती आहेत. यांना मोठ्या प्रमाणावर निधी शासनाकडून देण्यात येत आहे. मात्र मागील दोन वर्षात ग्राम पंचायतींनी केवळ ५० टक्केच निधी खर्च केल्याची माहिती पुढे आली आहे.
जिल्हा सामाजिक, आर्थिक समालोचन- २०१३ च्या अहवालातून ग्राम पंचायतींनी सरासरी केवळ ४९.२६ टक्के निधी खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील ग्राम पंचायतींना स्थानिकस्तरावर जमीन व इतर मालमत्ता कर, इतर कर व शुल्काच्या माध्यमातून उत्पन्न मिळत असते. तसेच शासनाकडून शासकीय अनुदान, अंशदान देणग्या व इतर अनुदानाच्या माध्यमातून उत्पन्न मिळते.
जिल्ह्यात ४६७ ग्राम पंचायती आहेत. या ग्राम पंचायतींना २०११-१२ मध्ये विविध माध्यमातून २ हजार ८२.८८ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी सर्वच ग्राम पंचायतींच्या खर्चाची टक्केवारी ५१.४८ टक्के एवढी असल्याचे अहवालात नमूद केले आहे. २०१२-१३ या वर्षात सर्वच ग्राम पंचायतींना २ हजार २६२.३८ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. त्यापैकी १ हजार ४१.५ लाख रूपये खर्च करण्यात आले. खर्चाची टक्केवारी ४६.०४ टक्के आहे.
ग्राम पंचायतींना प्रशासन, आरोग्य व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक दिवाबत्ती, शिक्षण, लोककल्याण व इतर बाबीवर खर्च करावा लागतो. जिल्ह्यातील ग्राम पंचायतींनी २०११-१२ मध्ये आरोग्य व स्वच्छतेवर २८.५० टक्के, सार्वजनिक बांधकाम १४ टक्के, सार्वजनिक दिवाबत्ती १०.८१ टक्के, शिक्षण ७.४६ टक्के, लोककल्याण १.३४ टक्के तर इतर बाबीवर २.८० टक्के खर्च केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२०१२-१३ मध्ये ग्राम पंचायतींनी आरोग्य व स्वच्छतेवर २३.५१ टक्के, सार्वजनिक बांधकाम १४.९५ टक्के, सार्वजनिक दिवाबत्ती ११.६२ टक्के, शिक्षण ७.२० टक्के, लोककल्याण १.१८ टक्के व इतर बाबीवर २.४१ टक्के रक्कम खर्च केल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. २०११-१२ मध्ये जिल्ह्यातील ग्राम पंचायतींकडे १०१०.६५ अखर्चित होते. तर २०१२-१३ मध्ये १२२०.८८ लाख रूपये अखर्चित होते.