जंगल न तोडता रोजगार मिळवा अगरबत्ती व वीटभट्टी प्रकल्प सुरू
By Admin | Updated: May 17, 2014 23:41 IST2014-05-17T23:41:23+5:302014-05-17T23:41:23+5:30
जिल्ह्यात जंगल असेपर्यंत आपली उपजीविका कायम आहे. जंगल धोक्यात आल्यास सर्वच धोक्यात येईल. त्यामुळे जंगल न तोडता रोजगार उपलब्ध करून घ्यावा,

जंगल न तोडता रोजगार मिळवा अगरबत्ती व वीटभट्टी प्रकल्प सुरू
प्रधान वन सचिवांचे आवाहन
चामोर्शी : जिल्ह्यात जंगल असेपर्यंत आपली उपजीविका कायम आहे. जंगल धोक्यात आल्यास सर्वच धोक्यात येईल. त्यामुळे जंगल न तोडता रोजगार उपलब्ध करून घ्यावा, यासाठी वनविभाग सहाय्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे प्रधान वनसचिव प्रविण परदेशी यांनी केले. चामोर्शी येथे अगरबत्ती व वीटभट्टी प्रकल्पाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. संयुक्त वनव्यवस्थापन समिती व वनपरिक्षेत्र चामोर्शी यांच्या संयुक्त विद्यमाने अगरबत्ती व वीटभट्टी प्रकल्प शनिवारी सुरू करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक टी. एस. के. रेड्डी होते. प्रमुख अतिथी म्हणून चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी एम. देवेंद्रसिंह, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, शुक्ला, उपविभागी वनाधिकारी बावनकर, पाटील, तिरपुडे, जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के उपस्थित होते. दरवर्षी शासनाला सव्वाशे कोटीचे उत्पन्न जिल्ह्यातील वनातून मिळते. दरवर्षी ५० कोटी मजुरी व ५० कोटी बोनस तेंदू हंगामातून दिला जातो. जिल्ह्यात ७ हजार ५०० गॅसचे वितरण करण्यात आले. पुन्हा ८५ हजार सुधारित चुली वाटप करण्यात येणार आहेत, अशी माहिती टी. एस. के. रेड्डी यांनी दिली. यावेळी २२ गावातील समितीच्या अध्यक्षांसोबत प्रधान सचिवांनी संवाद साधला. दरम्यान वनकर्मचारी व समित्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच बांबूहस्तकला कारागिरांना कीट देण्यात आले. संचालन वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार तर आभार सिद्धार्थ मेश्राम यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)