गडचिरोलीकरांचा ‘शेवट’चा प्रवास सुसह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 06:00 IST2020-03-04T06:00:00+5:302020-03-04T06:00:37+5:30
गडचिरोली शहरातील बहुतांश नागरिकांवर आरमोरी मार्गावरील वैनगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार केले जातात. ६० हजार लोकसंख्या असलेल्या गडचिरोली शहरातील दरदिवशी एखादा नागरिक मृत्यू पावतो. कधीकधी तर एकाच दिवशी दोन ते तीन अंत्ययात्रा निघतात. अंत्ययात्रेसाठी शेकडो नागरिक स्मशानघाटावर जातात. मात्र स्मशानघाटावर सोयीसुविधा नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.

गडचिरोलीकरांचा ‘शेवट’चा प्रवास सुसह्य
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गडचिरोली नगर परिषदेने वैनगंगा नदीघाटावरील मोक्षधामावर सर्वच सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी येणारा प्रत्येक नागरिक मोक्षधाम बघून समाधान व्यक्त करते. आजची स्थिती भविष्यातही कायम राहील, याची खबरदारी नगर परिषदेने घेणे गरजेचे आहे.
गडचिरोली शहरातील बहुतांश नागरिकांवर आरमोरी मार्गावरील वैनगंगा नदीघाटावर अंत्यसंस्कार केले जातात. ६० हजार लोकसंख्या असलेल्या गडचिरोली शहरातील दरदिवशी एखादा नागरिक मृत्यू पावतो. कधीकधी तर एकाच दिवशी दोन ते तीन अंत्ययात्रा निघतात. अंत्ययात्रेसाठी शेकडो नागरिक स्मशानघाटावर जातात. मात्र स्मशानघाटावर सोयीसुविधा नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. हिंदू धर्मात अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्याची प्रथा आहे. मात्र पाऊस असल्यास चितेला अग्नी देणे कठीण होत होते.
नगर परिषदेने शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानंतर शासनाने मोक्षधाम बनविण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. मोक्षधामाचे काम जवळपास दोन वर्ष लांबले. या दोन वर्षांच्या कालावधीत मोक्षधामाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर मात्र या ठिकाणी वीज पुरवठा व पाणीपंपासाठी जवळपास एक वर्षाचा कालावधी लागला. आता सर्वच सोयीसुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. डांबरी रस्त्यापासून मोक्षधामपर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना विश्रांतीसाठी तसेच शोकसभा घेण्यासाठी जवळपास ५० फूट व्यासाचे प्रशस्त श्रद्धांजलीगृह निर्माण करण्यात आले आहे. अंत्यविधी करण्यासाठी शेड उभारण्यात आले आहे. या शेडच्या इमारतीत लोखंडाचे तीन चबुतरे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे एकाचवेळी तीन नागरिकांवर अंत्यसंस्कार करता येतात. शेडमुळे पावसाळ्यातही अग्नी देणे शक्य होते. याच इमारतीत नळाची सुविधा आहे. नळाच्या सहाय्याने पाण्याचा प्रवाह मारल्यानंतर राख पाटाद्वारे नदीत जाते. या परिसरात दोन शौचालय सुद्धा बांधण्यात आले आहेत. नदीपात्रात जाण्यासाठी पायºया बनविल्या आहेत. मोक्षधामच्या संपूर्ण परिसरात गट्टू लावले आहेत. तसेच काही झाडे सुद्धा लावली आहेत.
गोलाकार श्रद्धांजलीगृह वेधते लक्ष
मोक्षधाम परिसराची मुख्य इमारत म्हणजे श्रद्धांजलीगृह होय. ही इमारत जवळपास ५० फूट व्यासाची गोलाकार आहे. या इमारतीत शोकसभा घेण्यासाठी एका बाजूला मंच तयार केला आहे. नागरिकांना बसण्यासाठी भिंतीच्या सभोवताल चबुतरा बांधण्यात आला आहे. या सभागृहात जवळपास २०० ते ३०० व्यक्ती बसू शकतात. चारही बाजूने अर्धवट भिंती उभारल्या आहेत. त्यामुळे चारही बाजूने थंडीगार हवा श्रद्धांजलीगृहात येते. या ठिकाणी सभोवताल पंखे, लाईट लावण्यात आले आहेत. तसेच विविध संतांचे विचार लिहिण्यात आले आहेत. या ठिकाणी येणारे अनेक नागरिक हे विचार वाचण्यात मग्न होतात.
निसर्गरम्य वातावरणाने दु:ख होते हलके
अंत्यविधीसाठी येणारा प्रत्येक नागरिक दु:खी अंत:करणाने मोक्षधाममध्ये आलेला असतो. मात्र मोक्षधामचा निसर्गरम्य परिसर बघून त्याचे दु:ख कमी होण्यास मदत होते. अगदी कठाणी नदीच्या काठावर मोक्षधामची इमारत आहे. कठाणी नदीचा निसर्गरम्य वातावरण, बाजूला असलेले उंच पूल, त्यावरून जाणारी वाहने हा एकूणच वातावरण मनाला आनंद देऊन जातो. त्यामुळे काहीकाळ दु:खाचा विसर पडून निसर्गरम्य वातावरणाशी मन एकरूप होते.