गडचिरोलीच्या मत्स्य पालनाला येणार ‘अच्छे दिन’
By Admin | Updated: August 7, 2016 01:43 IST2016-08-07T01:43:44+5:302016-08-07T01:43:44+5:30
पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० वर मामा मालगुजारी तलाव आहेत. या तलावात मासेमारी

गडचिरोलीच्या मत्स्य पालनाला येणार ‘अच्छे दिन’
डीपीसीत ठराव : मत्स्य विज्ञान उपकेंद्र स्थापन करणार
गडचिरोली : पूर्व विदर्भाच्या गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० वर मामा मालगुजारी तलाव आहेत. या तलावात मासेमारी हा पारंपारिक व्यवसाय अनेक लोक करतात. या मासेमारी व्यवसायाला आता ‘अच्छे दिन’ येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. गडचिरोली जिल्हा नियोजन व विकास समितीने गडचिरोली येथे मत्स्य विज्ञान उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव राज्य सरकारकडे पाठविला जाणार आहे.
गडचिरोली हा देशातील मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात रोजगाराच्या कोणत्याही संधी नाही. त्यामुळे उपलब्ध साधन- संसाधणाच्या आधारावर नागरिक आपली उपजिविका करीत असतात. गडचिरोली जिल्ह्यात ४ हजार ५०० मामा मालगुजारी तलाव आहेत. यातील काही तलाव हे जिल्हा परिषदेच्या तर काही लघू पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येतात. राज्य सरकारने गेल्या दोन- तीन वर्षांत मामा मालगुजारी तलावांच्या पुनर्जीवनासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे या तलावात स्थानिक मच्छीमार सहकारी संस्था व आता पेसा कायद्याची अंमलबजावणी झाल्यामुळे ग्राम पंचायती या तलावाच्या माध्यमातून मासेमारी व्यवसायाला प्रोत्साहन देत आहेत. जिल्ह्यात ४ हजार ८५० जलसाठे, मामा तलाव व पाटबंधारे तलावांच्या स्वरूपात आहे. या शिवाय जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे यामुळे तलावाची संख्या वाढणार आहे. या तलावांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्याचा उद्देश समोर ठेवून गडचिरोली जिल्हा नियोजन समितीने गडचिरोली जिल्ह्यात मत्स्य विज्ञान उपकेंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. अभ्यास व संशोधन या अनुषंगाने मासेमारी काम करणाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या उपक्रमात गोंडवाना विद्यापीठालाही सहभागी करून घेतले जाणार आहे. लवकरच हे मत्स्य विज्ञान उपकेंद्र गडचिरोलीत स्थापन होईल, या दृष्टीने प्रशासनाला काम करण्याची सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
मत्स्य पालनातून २२ कोटीची मिळकत
२१०० सिंचन तलाव असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात ८ हजार ६६६ हेक्टर क्षेत्र मत्स्य व्यवसायासाठी कामी येणारे आहे. त्यापैकी ५ हजार ३६९ हेक्टरवर मत्स्य व्यवसाय करण्यात आला. यातून ११०७४० टन मत्स्य उत्पादन झाले. २२३४ लाखांचे उत्पन्न या मत्स्य व्यवसायातून जिल्ह्यातील संस्थांना मिळाले आहे. जिल्ह्यात ९६ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था असून ११ हजार ३२९ सभासद या संस्थेशी जुळलेले आहेत.