कोरोना महामारीमुळे तेंदू हंगामाचे भवितव्य अधांतरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:16 IST2021-05-04T04:16:41+5:302021-05-04T04:16:41+5:30
कोरोना पाश्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे बाहेरील कंत्राटदार अद्यापही जिल्ह्यात पोहोचले नाहीत. त्यामुळे तेंदू हंगाम होणार की नाही ...

कोरोना महामारीमुळे तेंदू हंगामाचे भवितव्य अधांतरीच
कोरोना पाश्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन व संचारबंदीमुळे बाहेरील कंत्राटदार अद्यापही जिल्ह्यात पोहोचले नाहीत. त्यामुळे तेंदू हंगाम होणार की नाही याबाबत नागरिकांतून साशंकता व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात उत्तम दर्जाचा तेंदूपत्ता मिळतो त्यामुळे इतर राज्य व इतर जिल्ह्यातील कंत्राटदारांकडून जिल्ह्यात तेंदूपत्ता संकलनाचे काम केले जाते. जेमतेम १५ दिवस ते महिनाभर चालणाऱ्या या हंगामात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यातून तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या नागरिकांनाही चांगली आर्थिक मिळकत होते. त्यामुळे दरवर्षी नागरिक या हंगामाच्या प्रतीक्षेत असतात. सिरोंचा तालुक्याचा विचार करता सर्वच गावांमध्ये तेंदूपत्ता संकलनाचे काम केले जाते. परंतु मागील वर्षांपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीने पुन्हा डोके वर काढले आहे. यावर्षी राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. जिल्ह्यातील शहरांसोबतच गावांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने शासनाकडून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्याबाहेरील तेंदू कंत्राटदार अजूनपर्यंत जिल्ह्यात पोहोचले नाहीत. सध्या जंगलातील तेंदूपत्ता पुढील १० ते १५ दिवसात काढणी योग्य होणार आहे. परंतु ग्रामीण भागात अजूनपर्यंत तेंदू हंगामाबाबत कोणतीच चर्चा किंवा लिलाव प्रकिया सुरू झालेली नाही. त्यामुळे नागरिक संभ्रमात आहेत. सिरोंचा तालुक्यात कोणतेही उद्योग नसल्याने रोजगाराची बारमाही समस्या आहे. जंगलावर आधारित उद्योगांमुळेच येथील नागरिकांच्या हाताला काम मिळते. दरवर्षी नागरिक मिरची ताेड कामाकरिता शेजारच्या तेलंगणा राज्यात जात होते. परंतु महामारीमुळे यावर्षी नागरिक त्या कामाकरिता जाऊ शकले नाही.