चार वर्षांपासून व्याज सवलतीचे अनुदान थकले

By Admin | Updated: February 9, 2015 23:13 IST2015-02-09T23:13:09+5:302015-02-09T23:13:09+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने व्याज सवलत योजनेंतर्गत ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. या कर्जावरील व्याजाची रक्कम केंद्र व

For four years, interest subsidy exhausted | चार वर्षांपासून व्याज सवलतीचे अनुदान थकले

चार वर्षांपासून व्याज सवलतीचे अनुदान थकले

दिगांबर जवादे - गडचिरोली
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने व्याज सवलत योजनेंतर्गत ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. या कर्जावरील व्याजाची रक्कम केंद्र व राज्य शासन जिल्हा बँकेला उपलब्ध करून देईल, अशी तरतूद आहे. मात्र मागील चार वर्षांपासून व्याज सवलत अनुदानाचे २ कोटी ७ लाख ६९ हजार रूपये थकले आहेत. त्यामुळे सहकारी बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे.
शेतकऱ्याला कर्जासाठी सावकाराच्या दारात उभे होण्याची पाळी येऊ नये, त्याच बरोबर शेतकऱ्याला शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्राचा वापर करता यावा, कर्जासाठी कोणासमोर हात जोडण्याची पाळी येऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना व केंद्र शासनाकडून व्याज परतावा योजना राबविली जाते. या दोन्ही योजनेतून कर्जावरील व्याजाची ६ टक्के रक्कम शासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱ्यांकडून बिनव्याजासह कर्जाची वसुली करावी, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बिनव्याजासहच कर्ज वसूल करीत आहे. मात्र व्याजाची रक्कम शासनाकडून तत्काळ मिळत नसल्याने बँकेपुढची आर्थिक अडचणी वाढत चालली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गतचे मागील चार वर्षांपासूनचे १ कोटी २८ लाख ९९ हजार एवढे अनुदान थकले आहे. तर केंद्र शासनाच्या व्याज परतावा योजनेंतर्गतच्या २०१३-१४ या वर्षातील ७८ लाख ७० हजारापैकी एकही अनुदान प्राप्त झाले नाही. शासनाकडून नियमितपणे अनुदान प्राप्त होत नसले तरी बँक मात्र स्वत:कडेचे पैसे टाकून शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा थेट लाभ दरवर्षीच देत आहे, हे विशेष.

Web Title: For four years, interest subsidy exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.