जांभुळखेडातील चार सौर पथदिवे बंद
By Admin | Updated: July 17, 2014 00:06 IST2014-07-17T00:06:11+5:302014-07-17T00:06:11+5:30
राज्यातील विजेची वाढती मागणी, निर्मिती व पुरवठ्याची तूट लक्षात घेऊन राज्य शासनाने अपारंपारिक उर्जेचा वापर करून ग्रामीण भागातील रस्त्यावर सौर पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला.

जांभुळखेडातील चार सौर पथदिवे बंद
कुरखेडा : राज्यातील विजेची वाढती मागणी, निर्मिती व पुरवठ्याची तूट लक्षात घेऊन राज्य शासनाने अपारंपारिक उर्जेचा वापर करून ग्रामीण भागातील रस्त्यावर सौर पथदिवे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ग्रामपंचायतीला मिळालेल्या अनुदानातून कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा येथे सात सौर पथदिवे लागवण्यात आले. मात्र यापैकी चार पथदिवे तसेच तालुक्यातील काही गावातील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बंद असलेले सौर पथदिवे तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी पं.स. सदस्य चांगदेव फाये यांनी केली आहे.
जिल्ह्यासह कुरखेडा तालुक्यात केंद्र व राज्य शासनाच्या अनुदानातून ग्रामपंचयातीमार्फत सौर पथदिवे अनेक गावात लावण्यात आले. सन २०१२-१३, २०१३-१४ या वर्षात पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना, दलित वस्ती सुधार योजना व अन्य योजनेंतर्गत कुरखेडा तालुक्यात २५ ग्रामपंचायतीच्या हद्दीत एकूण १७१ सौरपथदिवे लावण्यात आले. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून जांभुळखेडासह कुरखेडा तालुक्यातील अनेक गावातील सौरपथदिवे बंद अवस्थेत आहे. सौर पथदिवे बंद असल्याची समस्या जांभुळखेडाच्या नागरिकांनी पं.स. सदस्य चांगदेव फाये यांच्याकडे मांडली. त्यांच्या समस्येची दखल घेऊन चांगदेव फाये यांनी गावकऱ्यासह गावातील सौर पथदिव्यांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत जांभुळखेडाच्या सरपंच सायत्रा गावडे, माजी पं.स. सदस्य जयराम नैताम, अशोक बन्सोड, मुख्याध्यापक फुलबांधे, मनोहर नैताम, कृष्णा मेश्राम, पंढरी मेश्राम, दिलीप धोंडणे आदी उपस्थित होते. कुरखेडा तालुक्यातील बंद असलेले सौर पथदिवे प्रशासनाने तत्काळ सुरू करावेत अशी मागणी चांगदेव फाये यांच्यासह जांभुळखेडा येथील नागरिकांनी केली आहे. सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)