वनपरिक्षेत्राला रिक्त पदांचे ग्रहण
By Admin | Updated: May 28, 2015 00:58 IST2015-05-28T00:58:49+5:302015-05-28T00:58:49+5:30
तालुक्यातील ८७ गावांचा समावेश असलेल्या चामोर्शी वनपरिक्षेत्रातील पाच वनरक्षकांची पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.

वनपरिक्षेत्राला रिक्त पदांचे ग्रहण
वनरक्षकांची पाच पदे रिक्त : वनसंरक्षण करताना होत आहे अडचण
चामोर्शी : तालुक्यातील ८७ गावांचा समावेश असलेल्या चामोर्शी वनपरिक्षेत्रातील पाच वनरक्षकांची पदे मागील अनेक दिवसांपासून रिक्त आहेत. त्यामुळे जंगलाचे संरक्षण करताना कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत आहे.
घोट वनपरिक्षेत्राचे विभाजन करून चामोर्शी वनपरिक्षेत्र कार्यालयाची स्थापना सन २००९ साली करण्यात आली. या वनपरिक्षेत्र कार्यालयात एकूण ५२ पदे मंजूर आहेत. यामध्ये वनपरिक्षेत्राधिकाऱ्याचे एक पद, वनपाल सहा पदे, वनमजूर आठ पदे, कार्यालयीन कर्मचारी दोन पदे, स्वच्छकाचे एक पद मंजूर आहे. ही सर्व पदे भरण्यात आली आहेत. मात्र वनरक्षणाची महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वनरक्षकाची ३४ पैकी २९ पदे भरण्यात आली आहेत. तर पाच पदे रिक्त आहेत. त्यामुळे जंगलाचे संरक्षण करताना कार्यरत कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सदर पदे भरण्याबाबत वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र अजूनपर्यंत सदर पदे भरण्यात आले नाहीत.
रिक्त पदांसोबत या वनपरिक्षेत्र कार्यालयातही अनेक समस्याही कार्यरत आहेत. वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांना निवासस्थान नाही, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात कार्यालय थाटण्यात आले आहे. या कार्यालयांतर्गत २२ वनसंरक्षण समित्या असून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र सभागृह आहे.
वनाच्या संरक्षणाबरोबरच परिसरातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी अगरबत्ती, विटाभट्टी प्रकल्प, वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने चालविले जातात. सुमारे १७ हेक्टरवर वनोद्यान तयार करण्यात आले आहे. याचेही नियोजन वनकर्मचाऱ्यांना करावे लागते. (शहर प्रतिनिधी)