अहेरी : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष कार्यकर्त्यांच्या भरवशावर चालणारा पक्ष आहे. या पक्षात कार्यकर्त्यांच्या सूचनांचे पालन केले जाते, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यात ‘परिवार संवाद’ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याचा प्रारंभ गुरुवारी अहेरी येथे करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राज्याध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार धर्मरावबाबा अत्राम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्री अत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन हकीम, प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर, रवींद्र सामला, आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांमुळे मोठा झाला आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांशी संवाद साधायला अहेरी येथे आलाे आहाेत. धर्मरावबाबा अत्राम यांना दिल्ली येथे पाठवायचे आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात पक्ष मजबूत करणे गरजेचे आहे. अहेरी उपविभागातील रखडलेले सर्व सिंचन प्रकल्प येत्या दोन वर्षांत कार्यान्वित केले जातील, असे आश्वासन पाटील यांनी दिले.
गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, या वर्षी ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पडली. हा लोकशाहीचा विजय आहे. गडचिरोली जिल्ह्यात लवकरच मोठी पोलीस भरती घेऊन जिल्ह्यातील बेरोजगारी दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देशमुख म्हणाले. सुरजागड प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी आ. धर्मरावबाबा अत्राम यांनी गृहमंत्र्यांकडे केली. यावेळी शेकडो कार्यकर्ते व ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांनीं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुरेंद्र अलोणे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.