दीक्षाभूमीसाठी पाच कोटींचा निधी देणार
By Admin | Updated: August 17, 2016 01:37 IST2016-08-17T01:37:09+5:302016-08-17T01:37:09+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी ...

दीक्षाभूमीसाठी पाच कोटींचा निधी देणार
सामाजिक न्यायमंत्र्यांचे आश्वासन : देसाईगंज नगर परिषदेतर्फे गुणवंताचा सत्कार
देसाईगंज : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देसाईगंज येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी सुमारे पाच कोटी रूपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देऊन विकासकामांना सुरूवात केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र समोर ठेवूनच शहराचा विकास होत असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
देसाईगंज शहरात कोट्यवधी रूपयांचे विकासकामे करण्यात आली आहेत. या विकासकामांचे लोकार्पण नामदार राजकुमार बडोले यांच्या हस्ते १६ आॅगस्ट रोजी करण्यात आले. यानिमित्त नगर परिषदेच्या सांस्कृतिक भवनात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार प्रा. अनिल सोले, आमदार क्रिष्णा गजबे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, पंचायत समिती सभापती प्रिती शंभरकर, नगराध्यक्ष शाम उईके, न.प. उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, मुरलीधर सुंदरकर, नाना नाकाडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजू जेठानी, भामानी, नगर परिषद मुख्याधिकारी तैमूर मुलानी, आबीदअली सय्यद, विकास साळवे, मनोज खोब्रागडे, शालू दंडवते, आशा राऊत, सुनिता ठेंगरी, करूणा गणवीर, निलोफर शेख, शोभा पत्रे, विजया सरदारे, भाविका तलमले, शरद मुळे, कल्पना माडावार, डॉ. महेश पापडकर आदी मान्यवर उपस्थित होत.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाजपा सरकार सर्वसामान्य जनतेला समोर ठेवून योजना आखत आहे. याच योजना गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या वेळी आखल्या असत्या तर आपल्या जिल्ह्याचा विकास कधीच झाला असता, भाजपाचे सरकार येऊन केवळ दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. या काळात देसाईगंज नगर परिषदेला राज्य सरकारने कोट्यवधी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. येणाऱ्या तीन वर्षात देसाईगंज-गडचिरोली हा रेल्वे मार्ग पूर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प राहिल, असे प्रतिपादन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. (वार्ताहर)