पाणी पातळी घटल्याने मत्स्य व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST2021-01-13T05:36:45+5:302021-01-13T05:36:45+5:30

जोगीसाखरा : या भागातील काही तलावांच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. फेब्रुवारी महिन्यात तलाव कोरडे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ...

Fisheries are in trouble due to declining water levels | पाणी पातळी घटल्याने मत्स्य व्यवसाय अडचणीत

पाणी पातळी घटल्याने मत्स्य व्यवसाय अडचणीत

जोगीसाखरा : या भागातील काही तलावांच्या पाण्याची पातळी कमी होत आहे. फेब्रुवारी महिन्यात तलाव कोरडे पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासेमारी अडचणीत येणार आहे. नदीच्या पाण्याचीही पातळी घटत चालली आहे. त्यामुळे या ठिकाणीही मासेमारी करणे अडचणीचे झाले आहे.

आरमोरीत समाजकल्याण विभागाचे वसतिगृह हवे

आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करण्याची गरज आहे.

मूलचेरा शहरात पाळीव डुकरांचा हैदोस

मूलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.

कव्हरेज नसल्याने नागरिक त्रस्त

अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मुख्य मार्गावरील गोलाकर्जी गावात कव्हरेज नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गोलाकर्जी रस्त्यावर असल्याने राजाराम, खांदला, पत्तीगाव, चिरेपल्ली, छल्लेवाडा, मरनेली आदी गावातील नागरिकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क होत नाही.

भामरागड तालुक्यातील गावे लाईनमनअभावी

भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजना व कृषिपंपाना विद्युत पुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाईनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावात लाईनमन नसल्याने विद्युत पुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाईनमकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाही.

रिकाम्या भूखंडामुळे घाण वाढली

आलापल्ली : शहरातील अनेक वॉर्डांमध्ये रिकामे प्लॉट आहेत. सदर प्लॉट हे खोल असल्याने तिथे सांडपाणी साचते. परिणामी तिथे राहणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी, डास, घाण कचरा, अस्वच्छता यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परिणामी लहान मुले व मोठ्या माणसाच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

पेंढरी येथे गॅस एजन्सीची गरज

धानोरा : वन विभागामार्फत संयुक्त वन व्यवस्थापनचे सदस्य व जंगल परिसरातील नागरिकांना अनुदानावर मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले आहे. पेंढरी परिसरातील जवळपास ९० टक्के कुटुंबांकडे गॅस आहेत. मात्र गॅस एजन्सी केवळ धानोरा येथेच आहे. पेंढरी हे परिसरातील मोठे गाव आहे. या गावात गॅस एजन्सी दिल्यास नागरिकांसाठी सोयीचे होईल.

इंदिरानगरच्या नाक्यावर पुरेसे कर्मचारी द्या

गडचिरोली : इंदिरानगर येथील नाक्यावर केवळ अपुरे कर्मचारी तैनात आहेत. या कर्मचाऱ्यांना सतत तीन पाळीमध्ये आपली जबाबदारी निभवावी लागत आहे. एका कर्मचाऱ्याला किमान १६ तास काम करावे लागत आहे. त्यामुळे नाक्यावरील कर्मचारी त्रस्त आहेत. धानोरा तालुक्यातून मोठ्या प्रमाणात गडचिरोलीमार्गे लाकडांची वाहतूक होते.

जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करा

चामोर्शी : अपघात झाल्याने काही प्रमाणात मोडलेले वाहने अपघातानंतरच्या न्यायालयीन प्रकरणामुळे किंवा कागदपत्रा अभावी पोलीस ठाण्यामध्येच ठेवली आहेत. ही वाहने बाहेरच असल्याने ती भंगार झाली आहेत. वाहने लिलाव केल्यास गरजू व्यक्तींना याचा लाभ होईल. त्यामुळे वाहनांचा लिलाव करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

मद्यपी वाहनचालकांवर कारवाई थंडबस्त्यात

गडचिरोली : तालुक्यात अनेक दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारक दारू प्राशन करून वाहन चालवितात. याकडे वाहतूक तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत आहे. तालुक्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

Web Title: Fisheries are in trouble due to declining water levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.