वसतिगृह विद्यार्थ्यांचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण
By Admin | Updated: September 17, 2016 01:44 IST2016-09-17T01:44:00+5:302016-09-17T01:44:00+5:30
आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

वसतिगृह विद्यार्थ्यांचे जिल्हा कचेरीसमोर उपोषण
वाढीव कोट्यातून प्रवेश देण्याची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चेनंतर आंदोलन संपुष्टात
गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पांतर्गत वसतिगृहांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. मात्र अनेक जुने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. वाढीव कोटा मंजूर करून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा, या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थी संघाच्या बॅनरखाली आदिवासी वसतिगृहांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. जिल्हाधिकारी नायक यांच्याशी चर्चा झाल्यावर सकारात्मक आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आपले उपोषण मागे घेतले.
जुन्या प्रवेशीत विद्यार्थ्यांना महाविद्यालयाने दिलेल्या बोनाफाईड सर्टिफीकेटच्या आधारावर कुठलीही आडकाठी न आणता वसतिगृहात प्रवेश देण्यात यावा, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना ६५ टक्के जागांवर प्रवेश द्यावा, २०१३ ते २०१६ या तीन वर्षाच्या सत्रातील भारत सरकार शिष्यवृत्ती व परीक्षा शुल्क अदा करण्यात यावे, वसतिगृहात पाणी शुध्दीकरण यंत्र बसविण्यात यावे आदीसह विविध मागण्यांसाठी आविसचे जिल्हाध्यक्ष क्रांती केरामी यांच्या नेतृत्वात शहरातील आदिवासी वसतिगृहातील शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच करून कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने आविसच्या शिष्टमंडळांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांना शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन दिले. अनेक जुने विद्यार्थी वसतिगृह प्रवेशापासून वंचित असल्याने वाढीव कोटा मंजूर करून त्यांना प्रवेश देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. जिल्हाधिकारी नायक यांनी गडचिरोली प्रकल्पांतर्गत वसतिगृहात जेवढी प्रवेश क्षमता मंजूर आहे, तेवढे प्रवेश देण्यात आले आहेत. वाढीव कोट्याबाबतचा प्रस्ताव व तुमची मागणी शासनस्तरावर पाठविण्यात येईल. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर वाढीव कोट्यातून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. शिवाय येत्या १५ दिवसात वसतिगृहातील सर्व समस्या निकाली काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर १५ मिनिटांनी विद्यार्थ्यांनी आपले उपोषण मागे घेतले. या आंदोलनात गडचिरोलीतील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. (स्थानिक प्रतिनिधी)