तिरंगी लढतीत अपक्षांनी वाढविली डोकेदुखी

By Admin | Updated: October 7, 2014 23:34 IST2014-10-07T23:34:52+5:302014-10-07T23:34:52+5:30

आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र आजपर्यंत कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला नाही हे निवडणुकीदरम्यान सिध्द झाले आहे़ मतदारांच्या पसंतीला उतरण्यासाठी विकासकामांची सरबत्ती

Females face frustration in the tri-match | तिरंगी लढतीत अपक्षांनी वाढविली डोकेदुखी

तिरंगी लढतीत अपक्षांनी वाढविली डोकेदुखी

देसाईगंज : आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्र आजपर्यंत कोणत्याही एका पक्षाचा बालेकिल्ला नाही हे निवडणुकीदरम्यान सिध्द झाले आहे़ मतदारांच्या पसंतीला उतरण्यासाठी विकासकामांची सरबत्ती हा एकमेव उपाय असल्याचे वारंवार निवडणुकीमध्ये मतदारांनी उमेदवारांना मतदानाच्या माध्यमातून सांगितले आहे. कधी शिवसेना तर कधी काँग्रेस पक्षानी या विधानसभा क्षेत्राचे नेतृत्व केले आहे़ मात्र आजपर्यंत कोणत्याही उमेदवारांनी सातत्याने १० वर्षापेक्षा जास्त काळ या विधानसभेची खुर्ची सांभाळलेली नाही़
आघाडी व युतीच्या तुटण्यामुळे सर्व राजकीय पक्षासाठी ही निवडणूक अस्मितेची झाली आहे. त्यामुळेच या निवडणुकीत चुरस वाढलेली आहे़ मागील विधानसभेच्या तुलनेत या विधानसभा निवडणुकीत नवीन नोंद झालेल्या ३२ हजार ९६१ मतदारांचा कौल कोणाच्या बाजुने राहणार यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे़ मागील निवडणुकीमध्ये आनंदराव गेडाम यांना सुरेन्द्र चंदेल याच्याकडून ५ हजार ५५५ मतांचा निसटता विजय मिळविता आला. मात्र या निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. त्यात अपक्षांची बाजूदेखील भक्कम असल्यामुळे उमेदवारांची दमछाक उडणार आहे़
मागील कित्येक वर्षाची असलेली सेना- भाजपाची युती तुटल्यामुळे आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील भाजपागटात वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे़ आजपर्यंत विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपागटात निरव शांतता पसरलेली दिसत होती,़ मात्र युती तुटताच भाजपाने अगदी नवखा उमेदवार उभा करून उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे़ पाच महिन्याआधी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देसाईगंजमध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा केवळ १२०० मते अधिक मिळाले होते़ यावरून शहरात काँग्रेस पक्षाची मते सुद्धा भाजप इतकीच आहेत, हे सिद्ध झाले आहे़ तालुक्यात काँगे्रस पक्षाकडे सध्या कार्यकत्यांचा दुष्काळ पडलेला असल्याचे चित्र दिसत आहे़ निष्ठावंतानी तटस्थतेचे हत्यार घेतल्यामुळे आनंदराव गेडामांना ‘एकला चलो रे’ ची भूमिका घ्यावी लागली आहे़ स्वत:ला काँग्रेसचे निष्ठावंत म्हणविणारे कार्यकर्तेसुध्दा दुसऱ्यागटात जाऊन बसले असल्याचे चित्र दिसून येत आहे़ या मतदार संघात बीएसपीला जाणाऱ्या मतदानाची संख्यादेखील अधिक आहे़ मागील निवडणुकीत सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यामुळे गेडाम यांना निसटता विजय मिळविता आला़ या निवडणुकीत यांचे बंधू जयेंद्रसिंग चंदेल उभे आहेत. कुरखेडा, कोरची , मालेवाडा या भागात चंदेल गट सक्रिय आहे़ यापूर्वी नंदकुमार नरोटे यांनी प्रत्येक निवडणुकीत स्वत:चा वेगळा मतदार तयार केला आहे़ शिवसेनेचे पारंपरिक मतदार आहेतच़ राष्ट्रवादी पक्षालादेखील आरमोरीमध्ये चांगले मताधिक्य मिळू शकते़ वेळोवेळी मोर्चे काढून सर्वसामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी भाकपानेसुद्धा स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे़ या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्षाच्या मतांचे विभाजन होणार असल्याचे निश्चित झाले आहे़ मागील विधानसभेत आनंदराव गेडाम यांना ४१ हजार २५७ चा मताधिक्य प्राप्त झाले होते़ या निवडणुकीतदेखील ४० हजार मत मिळविणाऱ्या उमेदवाराचाही विजय होऊ शकतो.़ यासाठीच प्रत्येक पक्षानी जात पुढाऱ्यांना हाताशी घेऊन विजयरथात बसण्याची स्वप्ने पाहणे सुरू केली आहेत़ आरमोरीच्या वाड्याचे ज्याच्या डोक्यावर वरदहस्त राहील तो या रथात विराजमान होईल असेही नागरिकांमध्ये बोलले जात आहे. (वार्ताहर)

Web Title: Females face frustration in the tri-match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.