शेतकऱ्यांचे सोने बँकेकडे गहाण
By Admin | Updated: December 20, 2014 22:37 IST2014-12-20T22:37:57+5:302014-12-20T22:37:57+5:30
गेल्या काही वर्षात सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यातच काही भागात अकाली पाऊस तर काही भागात कमी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे आर्थिकचक्र बिघडले आहे.

शेतकऱ्यांचे सोने बँकेकडे गहाण
अडचण वाढली : मुदतीत सोडवणूक न झाल्याने लिलावाचा ससेमिरा
गडचिरोली : गेल्या काही वर्षात सततच्या नापिकीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे. त्यातच काही भागात अकाली पाऊस तर काही भागात कमी पाऊस यामुळे शेतकऱ्याचे आर्थिकचक्र बिघडले आहे. या परिस्थितीतून सावरण्यासाठी अनेक शेतकरी बँकांच्या सोनेतारण योजनेत आपल्या घरातील असलेले दागीणे बँकांकडे गहाण टाकून आपली अडचण भागवून घेत असल्याचे विदारक चित्र नक्षलग्रस्त गडचिरोलीसह राज्यातील अनेक भागात दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांकडून तारण योजनेत ठेवलेल्या दागिण्यांची सोडवणूक न झाल्याने बँकांनी त्यांच्या दागिण्यांचा लिलावही ठेवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
गेल्या तीन-चार वर्षांपासून सतत नापिकीचा शेतकरी सामना करीत आहे. शेतमालाचे भाव दरवर्षी वाढण्याऐवजी कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतीला लागलेला खर्चही निघणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील लग्नकार्यासारखे प्रसंग आल्यास संपूर्ण शेतकरी कुटुंब खचून जाते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पूर्वी खासगी सावकारांकडे शेतकरी धाव घेत होता. मात्र आता खासगी सावकाराविरोधातील कायदे कडक झाल्याने ग्रामीण भागात शेतकऱ्यांना कुणीही रोख स्वरूपात मदत करण्यासाठी सहजासहजी तयार होत नाही. त्यामुळे शेतकऱ्याची अडचण वाढत चालली आहे. बँकेकडे कर्जासाठी जावे तर जुने कर्ज फेडले नसल्याने नवे कर्ज बँक देत नाही, वा नाहरकत प्रमाणपत्र आठ ते दहा बँकांचे आणण्यासाठी सांगितले जाते. यात किमान दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी निघून जातो व कर्ज मिळेलच याची शाश्वतीही नसते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी घरी असलेले सोने आता राष्ट्रीयकृत, सहकारी बँकांकडे तारण ठेवून त्यावर मिळेल तेवढे पैसे घेण्यासाठी धडपडत आहे.
साधारणत: १ लाखापर्यंत आर्थिक रक्कम तारण योजनेतून शेतकऱ्यांना दिली जाते. सातबारा जोडल्यास व्याजदरात इतरांपेक्षा १ टक्का कमी व्याजदरही आकारले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी तारण योजनेतून सोने गहाण ठेवून कर्ज उचलत आहे. एका दिवसात तासाभरात हे कर्ज उपलब्ध होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा अशा कर्जाकडे ओढा आता वाढला आहे. मात्र काही शेतकरी कुटुंबाकडून तारण योजनेत ठेवलेल्या सोडवणूक करणे शक्य झाले नसल्याने त्यांच्या दागिण्याचा लिलाव या वर्षाअखेर होणार आहे. याबाबत बँकेने कायदेशिर प्रक्रियाही पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गडचिरोली जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांचे प्रमाण ५ हजाराच्यावर असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)