कारले पिकाकडे शेतकऱ्यांचा कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 06:00 AM2019-12-09T06:00:00+5:302019-12-09T06:00:17+5:30
धान पिक निघाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी प्रामुख्याने भाजीपाला पिकाची लागवड करतात. कारले हे पीक कमी खर्चात येणारे पीक असल्याने शेतकरी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करते. या परिसरातील कारले नागपूर बाजारपेठेत पाठविली जातात.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : रबी हंगामात आरमोरी, कुरखेडा, देसाईगंज या तालुक्यांमध्ये कारले या भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. यावर्षी पाणी उपलब्ध असल्याने शेतकरी भाजीपाला पिकाची लागवड करीत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाजीपाल्याचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
धान पिक निघाल्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे, असे शेतकरी प्रामुख्याने भाजीपाला पिकाची लागवड करतात. कारले हे पीक कमी खर्चात येणारे पीक असल्याने शेतकरी या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात करते. या परिसरातील कारले नागपूर बाजारपेठेत पाठविली जातात. खरेदीदार उपलब्ध असल्याने शेतकरी दिवसेंदिवस या पिकांकडे वळत चालला असल्याचे दिसून येते. कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी हे तालुके कारले उत्पादनासाठी प्रसिध्द मानली जातात. या परिसरातील शेतकऱ्यांनी कारले उत्पादनाची आधुनिक पध्दत अवलंबिली असल्याने अधिक प्रमाणात उत्पादन होण्यास मदत होते. सध्या कारले पिकाची झाडे जमिनीतून बाहेर निघत आहेत. एक ते दीड महिन्यात कारले लागण्यास सुरूवात होत असल्याने अत्यंत कमी कालावधीत उत्पन्न मिळत असल्याने शेतकरी या पिकाकडे वळत चालला आहे.
उन्हाळ्यात शेती पडिक राहत होती. मात्र आता भाजीपाला उत्पादनामुळे शेतीत पीक घेण्याची संधी निर्माण झाली आहे.