कापूस, सूर्यफूल व तीळ पिकाकडे वळला शेतकरी
By Admin | Updated: April 20, 2015 01:28 IST2015-04-20T01:28:14+5:302015-04-20T01:28:14+5:30
गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक हे धान असले तरी शेतकरी आता धान पिकासोबतच ज्वारी, मका, तीळ, सोयाबीन, कापूस, ऊस पिकाकडेही वळला आहे.

कापूस, सूर्यफूल व तीळ पिकाकडे वळला शेतकरी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचे प्रमुख पीक हे धान असले तरी शेतकरी आता धान पिकासोबतच ज्वारी, मका, तीळ, सोयाबीन, कापूस, ऊस पिकाकडेही वळला आहे. व खरीप हंगामात या पिकांच्या लागवडीसाठी शेतीची मशागत करण्याच्या कामात मग्न झाला आहे. या सोबतच कृषी विभागानेही खरीप हंगामासाठी खत व बियाणे याची टंचाई भासू नये म्हणून नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील पीक पॅटर्नमध्ये बदल होत असल्याने कृषी विभागाला आपले पारंपरिक नियोजनही बदलवावे लागणार आहे. जिल्ह्यात यांत्रिकी शेतीवर गेल्या काही वर्षात भर दिल्या जात असल्याने शेतकरी गट मॅट नर्सरीही तयार करीत आहे.
सध्या जिल्ह्यात शेतीच्या मशागतीचे दर वाढले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पुरूष मजुराचा रोज १५० ते २०० रूपये, महिला मजुराचा रोज १०० ते १२५ रूपये आहे तर बैलजोडीद्वारे नांगरणीसाठी ५०० रूपये रोज, वखरणीसाठी ७०० रूपये रोज तर ट्रॅक्टरद्वारे शेतीच्या मशागतीसाठी ६०० ते १००० रूपये तास घेण्यात येत आहे. शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेतीची नांगरणी करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)