ठोक विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयश
By Admin | Updated: June 16, 2015 02:07 IST2015-06-16T02:07:26+5:302015-06-16T02:07:26+5:30
१ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या तीन जिल्ह्यात अवैध

ठोक विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात अपयश
धाडीनंतरही अवैध दारूविक्री जोरातच : बड्या दारू विक्रेत्यांवर यंत्रणेची मेहरनजर
गडचिरोली : १ एप्रिल २०१५ ला चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या तीन जिल्ह्यात अवैध दारूविक्रेत्यांविरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात ठोक दारू विक्रेत्यांवर मुस्क्या आवळण्यात पोलिसांना यश न आल्याने येथे गावागावात अवैध दारूचा व्यवसाय धाडीनंतरही जोरदार सुरू आहे.
दररोज १ कोटी रूपयांच्या वर अवैध दारूविक्री संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यातील काही महत्त्वाची गावे दारू तस्करीचे मुख्य केंद्र झाले असून किरकोळ विक्रेत्यांवर पोलीस कारवाई करून त्यांची माहिती प्रसार माध्यमांना छायाचित्रासह देत आहे. मात्र हे किरकोळ विक्रेते ज्या ठोक विक्रेत्यांकडून दारू आणतात. त्यापैकी एकावरही अद्याप कारवाई झालेली नाही. अनेक किरकोळ विक्रेत्यांनी धाडीनंतर पोलिसांना ठोक विक्रेत्याचे नावही सांगितले. परंतु पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्यात धजावत नाही, अशी माहिती पोलिसांनी कारवाई केलेल्या किरकोळ दारू विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली. आरमोरी तालुक्यात वैरागड हे ठोक दारू विक्रीचे मुख्य केंद्र आहे. आरमोरी परिसरातील जंगलात गोंदिया जिल्ह्यातून दारू आणून ती गावागावात पोहोचविण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.
मात्र आरमोरी पोलिसांना अद्यापही या ठोक दारू विक्रेत्यावर कारवाई करता आलेली नाही. पथकातील अनेक कर्मचारी दौऱ्याची माहिती या विक्रेत्याला दररोज देतात. असाही एक मोठा गौप्यस्फोट समोर आला आहे. त्यामुळे हे दारू विक्रेते मस्तवान झाले आहे. यंत्रणा आपण खिश्यात घेऊन फिरत असल्याचा दावा हा दारू विक्रेता आरमोरी येथे जाहीररित्या करू शकतो. यावरूनच सर्व काही लक्षात येण्यासारखे आहे. सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, धानोरा, कोरची या तालुक्याच्या सीमा छत्तीसगड, तेलंगणा राज्याला लागून आहे. तेथूनही मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे दारू येत आहे. या परप्रांतातून येणाऱ्या अवैध दारूकडे पोलिसांचे दुर्लक्ष आहे. वाहनातूनच दारू येत नाही तर बैलबंडी व एसटी महामंडळाच्या बसगाड्यातूनही दारू आणली जात आहे. पोलीस यंत्रणा दारू पकडण्यात अपयशी ठरली आहे.
२५ कि.मी.च्या परिघाचा मुद्दा पडला थंड
गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या तीन जिल्ह्याच्या सीमांना लागून असलेल्या भंडारा, गोंदिया, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यातील जिल्हा सीमेपासून २५ किमी अंतरावरील दारू दुकान बंद करण्याबाबत शासनाचा प्रस्ताव होता. चंद्रपूरची दारूबंदी झाली, त्यावेळी याबाबत सुतोवाच करण्यात आले होते. मात्र अडीच महिने उलटूनही सरकारने या संदर्भात काहीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे या जिल्हा सीमेवरून मोठ्या प्रमाणावर दारू आणली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात येथूनच दारू जंगलांमध्ये उतरविली जात आहे.
२५ कि.मी.च्या परिघाचा मुद्दा पडला थंड
गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या तीन जिल्ह्याच्या सीमांना लागून असलेल्या भंडारा, गोंदिया, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यातील जिल्हा सीमेपासून २५ किमी अंतरावरील दारू दुकान बंद करण्याबाबत शासनाचा प्रस्ताव होता. चंद्रपूरची दारूबंदी झाली, त्यावेळी याबाबत सुतोवाच करण्यात आले होते. मात्र अडीच महिने उलटूनही सरकारने या संदर्भात काहीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे या जिल्हा सीमेवरून मोठ्या प्रमाणावर दारू आणली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात येथूनच दारू जंगलांमध्ये उतरविली जात आहे.
मोबाईल फोनवर मिळते गडचिरोली शहरात दारू
गडचिरोली शहर दारूचे आगार झाले आहे. पोलिसांचे दारू विक्रेत्यांवर नियंत्रणच राहिलेले नाही. त्यामुळे प्रत्येक वार्डात एवढेच नव्हे तर शहरातील पॉश एरिया समजल्या जाणाऱ्या अनेक नगरांमध्ये भाड्याचे घर घेऊन दारूविक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. मोबाईल फोनवर दारूची मागणी केल्यास अवघ्या पाच मिनिटात दारूची निप हजर होते, अशी परिस्थिती आहे. सरकारी विश्रामगृहात ही दारू आणून देण्याचे काम करण्याचे धाडस या दारूविक्रेत्यांमध्ये आहे. याचा अर्थ दारूविक्रेते यंत्रणेपेक्षा कितीतरी मजबूत असले पाहिजे. याचा अंदाज घेता येऊ शकतो. महिलाही या कामात सराईत असून दारूच्या या अवैध विक्रीत कमी श्रमात प्रचंड पैसा मिळत असल्याने गडचिरोलीतील दारूबंदी आता नावालाच उरली आहे.
मोहफुलाच्या दारूची विक्री जोरात
४चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी होण्यापूर्वी तेथून अवैध मार्गाने मोठ्या प्रमाणावर दारू गडचिरोली जिल्ह्यात आणली जात होती. मात्र आता चंद्रपूरची दारूबंदी झाली. त्यामुळे तेथून होणारा दारूचा पुरवठा थांबला. त्यामुळे गडचिरोलीच्या जंगलात विविध भागात मोहफुलाची दारू काढण्याचा धंदा जोरात सुरू झाला आहे. अलिकडेच चामोर्शी, घोट, पोलीस व वन विभागाच्या पथकाने अवैैध मोहफुल दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. मात्र अजुनही अनेक ठिकाणी ग्रामीण भागात मोहफुलाची दारू काढून ती गावागावात पोहोचविली जात आहे.
दारूवाल्यांच्या हातात गेल्या ग्रामपंचायती
गावातील ग्रामसभा व तंटामुक्त समित्यांना दारू विक्रीविरोधात नियंत्रण करता येऊ शकते. परंतु अनेक गावात दारूचा व्यवसाय करणारेच लोक ग्रामपंचायतीवर पैशाच्या भरवशावर निवडून आले आहेत व त्यांनी आपले पॅनलही निवडून आणले आहे. त्यामुळे अशा गावात केवळ नामधारी बंदीचा ठराव घेऊन दारूविक्री जोरात सुरू आहे. अशा गावांची माहिती पोलिसांनी घेऊन अशा गावांसाठी विशेष उपाययोजना दारूबंदीकरिता करण्याची गरज आहे, अशी सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे.