विद्यार्थी घेणार शिक्षकांची परीक्षा
By Admin | Updated: January 3, 2015 01:16 IST2015-01-03T01:16:25+5:302015-01-03T01:16:25+5:30
स्थानिक धानोरा मार्गावरील शिवाजी कला महाविद्यालयात ५ ते ७ जानेवारी रोजी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवादरम्यान शिक्षकांची सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जाणार आहे.

विद्यार्थी घेणार शिक्षकांची परीक्षा
गडचिरोली : स्थानिक धानोरा मार्गावरील शिवाजी कला महाविद्यालयात ५ ते ७ जानेवारी रोजी ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवादरम्यान शिक्षकांची सामान्य ज्ञान परीक्षा घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे ही परीक्षा विद्यार्थी घेणार आहेत. त्यामुळे या परीक्षेविषयी विद्यार्थी व शिक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पसरली आहे.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व मराठी भाषा विभाग तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथे ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रंथ महोत्सवाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढावा, त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी तिनही दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या सर्व कार्यक्रमांमध्ये शिक्षकांची सामान्य ज्ञान परीक्षा विद्यार्थ्यांकडून घेतली जाणार आहे. या कार्यक्रमाची विशेष उत्सुकता विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. सामान्य ज्ञान स्पर्धेत सहभागी होऊ इच्छीनाऱ्या शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये १६ शिक्षकांना सहभाग घेता येणार आहे. यामध्ये प्रत्येकी ४ शिक्षकांचे ४ गट पाडण्यात आले आहेत. या सामान्य ज्ञान स्पर्धेच्या चार फेऱ्या असून पहिल्या फेरीमध्ये सामाजिकशास्त्र, दुसऱ्या फेरीमध्ये विज्ञान, तिसऱ्या फेरीमध्ये संगीत व चवथ्या फेरीत रॅपीड फायर पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत. प्रत्येक फेरीमध्ये पाच प्रश्नांचा अंतरभाव राहणार आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचे संचालन, परिक्षण व इतर सर्व बाबी विद्यार्थीच सांभाळणार आहेत.
आजपर्यंतच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये शिक्षकांचा प्रत्यक्ष सहभाग असतो. त्यामुळे कार्यक्रम आयोजनाची संधी विद्यार्थ्यांना मिळत नाही. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची क्षमता प्राप्त व्हावी, त्यांच्या ज्ञानकक्षा वृंदावाव्या यासाठी या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन शिक्षण विभागाने केले आहे. हा आगळावेगळा कार्यक्रम बघण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे. सदर कार्यक्रम ७ जानेवारी रोजी आयोजित केला जाणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड, प्रा. अविनाश गौरकर, विशेष प्रयत्न करीत आहेत. (नगर प्रतिनिधी)