अतिक्रमण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:30 IST2021-01-14T04:30:23+5:302021-01-14T04:30:23+5:30
वाहनांचे अतिक्रमण वाढले देसाईगंज : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहन उभे करून प्रवासी भरण्यास बंदी ...

अतिक्रमण वाढले
वाहनांचे अतिक्रमण वाढले
देसाईगंज : शासनाच्या नियमानुसार एसटीच्या बसथांब्यापासून २०० मीटर अंतरावर खासगी वाहन उभे करून प्रवासी भरण्यास बंदी असली, तरी देसाईगंज येथे या नियमाचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. अतिक्रमणामुळे देसाईगंज शहरामध्ये वाहतुकीची कोंडी आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.
बसस्थानकावर गतिरोधक उभारा
गडचिरोली : तालुक्यातील तसेच गडचिरोली-आरमोरी मार्गावरील प्रमुख ठिकाण म्हणून पोर्ला गावाची ओळख आहे. येथे नेहमीच बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. येथून वाहनधारक भरधाव वेगात वाहने हाकत असतात. त्यामुळे येथे गतिरोधक उभारावे.
झिंगानूर परिसरातील बंधारा नादुरुस्त
झिंगानूर : झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वनविभागाने लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्यजीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र, अल्प कालावधीतच बंधारा फुटला आहे.
अनेक कार्यालयांमधील बायोमेट्रिक नावापुरतेच
कोरची : शासकीय कार्यालयांत कर्मचारी, अधिकारी नियमित वेळेत उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आल्या आहेत. मात्र, काळाच्या ओघात अनेक कार्यालयांतील मशीन बंदावस्थेत असून याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष आहे.
पेट्रोलची अवैध विक्री
आष्टी : चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी शहरातील पेट्रोलपंपावरून ठोक स्वरूपात पेट्रोल नेऊन ठेवतात. गरजू दुचाकीस्वारांकडून एका लीटरमागे २० ते ३० रुपये जादा घेतात.
जाचक अटी रद्द करा
गडचिरोली : शासनाने वनहक्क अधिनियम २००६ अन्वये वनजमिनीचे पट्टे देण्याचे धोरण अमलात आणले आहे. मात्र, कागदपत्रांच्या अटीमुळे अद्यापही जिल्ह्यातील अनेक गरजू व गरीब नागरिक वनहक्काच्या पट्ट्यापासून वंचित असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वनहक्क पट्टे निकाली काढावे, अशी मागणी होत आहे.
माेकाट जनावरे वाढली
जिमलगट्टा : गावातील मोकाट जनावरे रस्त्यावर बसून राहतात. नागरिकांना व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याच मार्गावर गावातील मोकाट जनावरे बसून राहत असल्यामुळे खराब झाला आहे. जनावरे रस्त्यावर बसून राहत असल्यामुळे तिथे त्यांचे शेण पडून राहते. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.
कोडसेपल्लीत समस्या
अहेरी : परिसरातील दुर्गम भागात वसलेल्या कोडसेपल्ली येथे अनेक समस्यांची भरमार आहे. गावात नाल्यांचा अभाव असल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडचण जात आहे. परिणामी, जागोजाग सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. गावात मूलभूत साेयीसुविधा पुरवून रस्ते व नालीचे बांधकाम करावे.
प्रवासी निवारा जीर्ण
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवा-याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवा-याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. प्रवाशांना उन्हातान्हात आणि पावसात दुसरीकडे आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळे दुरुस्तीची गरज आहे.
सूर्यडाेंगरी मार्ग खड्डेमय
वडधा : नजीकच्या देलाेडा ते सूर्यडाेंगरी या पाच किमीमार्गाची दुरवस्था झाली आहे. जंगलातून हा मार्ग जात असला, तरी आरमाेरीला जाण्यासाठी देलाेडा परिसरातील अनेक वाहनधारक याच मार्गाचा वापर करतात. पाच वर्षांपासून मार्गाची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील गिट्टी उखडली असल्याने नूतनीकरणाची गरज आहे.