बसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा
By Admin | Updated: July 6, 2015 01:55 IST2015-07-06T01:55:26+5:302015-07-06T01:55:26+5:30
स्थानिक बसस्थानकासमोर अतिक्रमण वाढले असल्याने आगारातून बस निघताना वाहनधारकांना दिसत नाही.

बसस्थानकाला अतिक्रमणाचा विळखा
गडचिरोली : स्थानिक बसस्थानकासमोर अतिक्रमण वाढले असल्याने आगारातून बस निघताना वाहनधारकांना दिसत नाही. हीच समस्या बस आगारामध्ये जात असतानाही निर्माण होते. परिणामी अपघातांचे प्र्रमाण वाढले आहे. मात्र या गंभीर समस्यकडे नगर परिषदेसह एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
जिल्हास्थळावरील आगार असल्याने या आगारातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शेकडो बसेस धावतात. त्याचबरोबर इतर आगारातूनही गडचिरोली आगारात बस येतात. समोरच तहसील कार्यालय, पंचायत समिती, उपविभागीय कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असल्याने या परिसरात नेहमीच वाहन व नागरिकांची वर्दळ राहते.
आगारासमोरच्या मुख्य मार्गाला लागून असलेल्या जागेवर फळ विक्रेते, चहा विक्रेते, पानटपरीधारक व सलून दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकान थाटले आहेत. या दुकानांमुळे आगाराकडे जाण्याचे मार्ग केवळ खुले आहेत. इतर जागेवर अतिक्रमण वाढले आहे. परिणामी आगारातून मुख्य मार्गाकडे येणारी बस वाहनधारकांच्या दिसत नाही. त्यामुळे बस व इतर वाहनांच्या धडकेच्या घटना अलिकडेच वाढल्या आहेत. आगारामध्ये बस जातानाही अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अतिक्रमणामुळे आगाराचे सौंदर्यही नष्ट झाले आहे.
नगर परिषदेने अनेकवेळा या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र तो एक फार्सच ठरला आहे. दिवसेंदिवस अतिक्रमणाचा विस्तार होत असून ही समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे. अतिक्रमणधारकांमुळे अनेकांना आपले जीव गमवावा लागत आहे. तर दोष नसतानाही बसचालकांना कारवाईस सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सदर अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)