सव्वा दोन हजार कुटुंबांना रोजगार
By Admin | Updated: December 13, 2014 22:37 IST2014-12-13T22:37:38+5:302014-12-13T22:37:38+5:30
चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांच्या कालावधीत रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार २५३ कुटुंबाना १०० दिवसांचे रोजगार प्राप्त झाले. विशेष म्हणजे, रोजगार

सव्वा दोन हजार कुटुंबांना रोजगार
आठ महिन्यात १०० दिवस मिळाले मजुरांना काम
गडचिरोली : चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांच्या कालावधीत रोजगार हमी योजनेंतर्गत जिल्ह्यातील २ हजार २५३ कुटुंबाना १०० दिवसांचे रोजगार प्राप्त झाले. विशेष म्हणजे, रोजगार पुरविण्यात गडचिरोली जिल्ह्याचा राज्यात चौथा क्रमांक असून १ लाख ८ हजार ३६५ नागरिकांना रोजगार पुरविला आहे.
ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने २००५ साली महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कृषी व इतर विकासाची कामे केली जातात. गडचिरोली जिल्ह्यात चार महिने धानाची शेती सोडल्यानंतर आठ महिने बसूनच राहावे लागते. त्यामुळे रोहयोवर काम करण्यास मजूर मिळतात. त्याचबरोबर नक्षलप्रभावित जिल्हा असल्याने रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडून अतिरिक्त निधी गडचिरोली जिल्ह्याला प्राप्त होतो. सदर निधीतून रोहयोची कामे वर्षभर राबविली जात असल्याने गडचिरोली जिल्हा रोहयोच्या माध्यमातून रोजगार पुरविण्यात चौथ्या स्थानावर आहे.
चालू आर्थिक वर्षात गडचिरोली जिल्हा प्रशासनाने २ हजार २५३ कुटुंबांना १०० दिवस रोजगार उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये ७ लाख ४९ हजार ३११ दिवसांचा रोजगार महिलांना प्राप्त झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने नियमित रोजगाराची नेहमीच चणचण भासते. येथील मजुरांना नेहमीच कामाची शोधाशोध करावी लागते. मिळेल ते काम करावे लागते. तरीही रोजगार मिळत नसल्याने येथील मजुरांना दुसऱ्या जिल्ह्यात रोजगारासाठी भटकावे लागते. अशा परिस्थितीत रोहयोची कामे जवळपास वर्षभर चालत असल्याने नागरिकांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.
रोहयोचे पैसे आता सरळ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत. त्यामुळे या योजनेत असलेला गैरव्यवहार फार कमी झाला असून लाभार्थ्यांला त्याच्या कामाचा मोबदला मिळू लागला आहे. त्यामुळेही रोजगार हमी मजुरांमध्ये उत्साह दिसून येत आहे. थोडाफार उशीरा पैसा मिळत असला तरी सदर पैसा बुडत नाही. याची शाश्वती मजुरांना असल्याने रोहयो कामावर जाणाऱ्यांची संख्या वाढत आहे. (नगर प्रतिनिधी)