एक लाख मजुरांना मिळाला रोजगार

By Admin | Updated: July 24, 2015 01:27 IST2015-07-24T01:27:08+5:302015-07-24T01:27:08+5:30

१ एप्रिल ते २२ जुलैपर्यंत जिल्हाभरातील १ लाख ११ हजार ३२३ मजुरांना रोहयोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे.

Employment of one lakh laborers | एक लाख मजुरांना मिळाला रोजगार

एक लाख मजुरांना मिळाला रोजगार

रोहयोची कामगिरी : १७ लाख ८१ हजार मनुष्यदिवस काम
गडचिरोली : १ एप्रिल ते २२ जुलैपर्यंत जिल्हाभरातील १ लाख ११ हजार ३२३ मजुरांना रोहयोच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. या मजुरांना सुमारे १७ लाख ८१ हजार १५६ मनुष्य दिवस रोजगार मिळाला आहे.
शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात रोजगाराची समस्या सुरुवातीपासूनच गंभीर आहे. शेतीच्या कालावधीत दोन महिने वगळता इतर कालावधीत रोजगारच मिळत नाही. रोजगार उपलब्ध नसल्याने याचा परिणाम उत्पन्नावर पडत होता. शहरातील शिकलेले तरूण रोजगारासाठी शहरात जात असले तरी निरक्षर व्यक्तीला रिकामे राहिल्याशिवाय पर्याय राहला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन केंद्र शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेंतर्गत काम मागणाऱ्या प्रत्येक मजुराला वर्षातून किमान १०० दिवसांचा रोजगार उपलब्ध करून देणे बंधनकारक झाले आहे. रोजगार उपलब्ध न झाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धान पिकाच्या कालावधीत जून ते आॅक्टोबर या कालावधीपर्यंत रोजगार उपलब्ध होते. त्यानंतर मात्र रोजगारासाठी वनवन भटकावे लागते. अशा नागरिकांसाठी रोजगार हमी योजना अत्यंत मोलाची ठरली आहे. अनेक नागरिक रोजगार हमी योजनेच्या कामाची आतुरतेने वाट बघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात बघायला मिळते. आर्थिक वर्षाला सुरुवात झाल्यापासून ते २२ जुलैपर्यंत सुमारे १ लाख ११ हजार ३२३ मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या मजुरांना १७ लाख ८१ हजार १५६ मनुष्य दिवस रोजगार देण्यात आला आहे. सर्वाधिक २ लाख ५८ हजार ६६६ मनुष्य दिवस रोजगार चामोर्शी तालुक्यातील नागरिकांना उपलब्ध झाला आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बेरोजगारी दूर होण्यास फार मोठी मदत झाली आहे.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेती उपयोगी कामे केली जातात. विशेषकरून बंधारा, मजगीचे काम, बोडी दुरूस्ती, तलावाचे खोलीकरण, पांदण रस्ता आदी कामे केली जातात. आजपर्यंत हजारो शेतकऱ्यांच्या शेतात मजगीची कामे करण्यात आली आहे. त्यामुळे आजपर्यंत पडीत असलेल्या जमिनीत शेतकरी उत्पन्न घेऊ लागले आहेत. परिणामी रोहयोमुळे शेतकरी व मजूरही सुखी झाला आहे. (नगर प्रतिनिधी)
१८ कोटी रूपये थकले
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नागरिकांना रोजगार उपलब्ध होत असला तरी या योजनेचे पैसे मजुरांना वेळेवर मिळत नाही, हा या योजनेचा सर्वात मोठा दोष मानल्या जातो. काम झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांशिवाय कधीकधी सहा महिने उलटूनही मजुरी उपलब्ध होत नाही. रोजगार हमी योजनेच्या एकूण कामापैकी सुमारे २ कोटी १४ लाख रूपये प्राप्त झाले नाही. यामध्ये अकुशल कामगारांचे ८५ लाख ९३ हजार तर रोजगार हमी योजनेच्या कामासाठी खरेदी करण्यात आलेल्या साहित्यावरील १ कोटी २८ लाख ७७ हजार रूपयांचा समावेश आहे.

Web Title: Employment of one lakh laborers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.