कृषीतील बायोमास प्रक्रियेतून रोजगार निर्मितीस वाव
By Admin | Updated: August 27, 2016 01:24 IST2016-08-27T01:24:02+5:302016-08-27T01:24:02+5:30
केवळ सरकारच्या भरवशावर विकासाच्या सर्व गोष्टी होऊ शकत नाही. विकासासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत,

कृषीतील बायोमास प्रक्रियेतून रोजगार निर्मितीस वाव
सारंग गडकरी यांचे प्रतिपादन : जिल्हा बँकेत संयुक्त देयता गटांचा गौैरव
गडचिरोली : केवळ सरकारच्या भरवशावर विकासाच्या सर्व गोष्टी होऊ शकत नाही. विकासासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजेत, कृषी क्षेत्रातील बायोेमास प्रक्रियेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीस मोठ्या प्रमाणात वाव आहे. हे आपण स्वानुभवाने शिकलो आहे, असे प्रतिपादन मानस अॅग्रो इंडिस्ट्रिज इन्फास्ट्रक्चर नागपूरचे संचालक सारंग नितीन गडकरी यांनी केले.
गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने बँकेच्या सभागृहात शुक्रवारी लघु व्यावसायिक सभासदांना मार्गदर्शन शिबिर व देयता गटांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार होते. विशेष अतिथी म्हणून बँकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, बँकेचे संचालक ईशांत पोरेड्डीवार, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी योगेंद्र शेंडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. पी. आयलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोेलताना सारंग गडकरी म्हणाले, लोकांना कर्जासाठी प्रवृत्त करणारी गडचिरोली ही माझ्या पाहणीतील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे. या बँकेमार्फत सर्वसामान्यांना आर्थिक विकास व बचतीचे धडे देण्याचे काम सातत्याने सुरू आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर या पूर्व विदर्भातील जिल्ह्यात धानपीक मोठ्या प्रमाणात होते. शेतीतील उत्पादन निघाल्यानंतर तणस व इतर टाकाऊ वस्तू मोठ्या प्रमाणात निघतात. या वस्तूंपासून अनेक पक्क्या वस्तू तयार करण्याचे काम होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात राईस मिल कल्चर विकसित होण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते, अशा विकासात्मक कामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी पुढे यावे, त्यांना आपण संपूर्ण सहकार्य करू, असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले. रोजगार मागणारे होण्यापेक्षा इतरांना रोजगार देणारे आपण सर्व झालो पाहिजेत, गडचिरोली जिल्ह्यात खनिज व वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात असल्याने कौशल्य विकासातून येथे रोजगार निर्मितीची भरभराट होऊ शकते, असेही ते म्हणाले. बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, गडचिरोलीची उद्योगविरहीत जिल्हा म्हणून सर्वत्र ओेळख आहे. मात्र कौैशल्य विकासाच्या माध्यमातून या जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग व प्रकल्प तसेच लघु प्रकल्प निर्माण झाले पाहिजे, यातून लघु उद्योगी गडचिरोली जिल्हा, अशी ओळख महाराष्ट्रात झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, संचालन व्यवस्थापक अरूण निंबेकर यांनी केले. तर आभार सहायक व्यवस्थापक आर. वाय. सोरते यांनी मानले. याप्रसंगी यशस्वी कार्य करणाऱ्या संयुक्त देयता गटांच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)