प्राथमिक शाळांना वर्ग ५ व ८ जोडू नये
By Admin | Updated: May 15, 2014 23:33 IST2014-05-15T23:33:30+5:302014-05-15T23:33:30+5:30
नवीन शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ५ वी व ८ वी तील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्यात येणार आहे.

प्राथमिक शाळांना वर्ग ५ व ८ जोडू नये
गडचिरोली : नवीन शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ५ वी व ८ वी तील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना इयत्ता ५ वी व ८ वी चे वर्ग जोडण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेशाकरिता सगळीकडे धावपळीची अवस्था निर्माण झाली आहे. प्राथमिक शाळांना वर्ग ५ व ८ जोडले तर त्याचा परिणाम अशासकीय शाळांच्या तुकड्या बंद होण्यावर होणार आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना इयत्ता ५ व ८ वीच्या तुकड्या जोडू नये, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाने केली आहे. काही संघटनांनी गडचिरोली जिल्ह्यात आरटीईच्या कलमामध्ये शिथिलता आणून इयत्ता ५ व ८ वा वर्ग सुरू करण्याची अनुक्रमे १ किमी व ३ किमी अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे अशासकीय माध्यमिक शाळेवर प्रतिकूल परिणाम होईल व विद्यार्थ्यांच्या अभावी तुकड्या बंद होण्याची नामुश्की येईल. पर्यायाने अनेक शिक्षकांच्या समायोजनाचा गंभीर प्रश्न शिक्षण विभागासमोर निर्माण होईल. त्यामुळे गडचिरोली जिल्हा मुख्याध्यापक संघाने या मागणीला तीव्र विरोध दर्शविला आहे. आरटीईच्या अटीमध्ये कोणत्याही प्रकारे शिथिलता आणू नये, अशी भूमिका जिल्हा मुख्याध्यापक संघाने घेतली आहे. प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शाळा सोडण्याचे दाखले देऊ नये, शिक्षण विभागाच्या मौखिक सूचनेनुसार दाखले देणे सुरू झालेले नाहीत तरीही काही संघटना आरटीईच्या कलमामध्ये शिथिलता आणून इयत्ता ५ व ८ चा वर्ग सुरू करण्याची १ व ३ किमीची अट रद्द करण्याची मागणी करीत आहेत. त्यामुळे अशासकीय शाळांवर विपरित परिणाम होण्याची भीती मुख्याध्यापक संघाने व्यक्त केली आहे. शाळा सोडण्याचा दाखला मिळण्याकरिता पालकाने शाळेशी संपर्क केल्यास तो त्वरित देण्यात यावा. त्यात कसल्याही प्रकारचा वेळकाढूपणा करण्यात येऊ नये, अशा सूचना संबंधित विभागाने प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना त्वरित निर्गमित कराव्यात, अशी मागणी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य संजय नार्लावार, सचिव प्राचार्य टी. के. बोरकर, उपाध्यक्ष प्राचार्य महेश तुम्पल्लीवार, प्राचार्य सी. एल. डोंगरवार, प्राचार्य संजय भांडारकर, प्राचार्य मनिष शेटे, प्राचार्य जयंत येलमुले यांनी केली आहे.