ईको चुलीने दोन रूपयात स्वयंपाक
By Admin | Updated: July 8, 2015 02:01 IST2015-07-08T02:00:56+5:302015-07-08T02:01:47+5:30
वन विभागाने ईको चूल निर्माण केली असून सदर चुलीच्या माध्यमातून केवळ दोन रूपयांच्या खर्चात कुटुंबाचा स्वयंपाक होतो.

ईको चुलीने दोन रूपयात स्वयंपाक
वन विभागाचा उपक्रम : पॅलेटस्वर चालते ईको चूल
प्रतीक मुधोळकर अहेरी
वन विभागाने ईको चूल निर्माण केली असून सदर चुलीच्या माध्यमातून केवळ दोन रूपयांच्या खर्चात कुटुंबाचा स्वयंपाक होतो. विशेष म्हणजे या चुलीच्या वापरामुळे पर्यावरणास कोणतीही हानी निर्माण होत नाही.
शहरातील जवळपास सर्वच कुटुंब स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसचा वापर करीत असले तरी ग्रामीण कुटुंबाला तेवढा खर्च करणे अशक्य राहते. त्याचबरोबर ग्रामीण भागात गॅसही उपलब्ध होत नाही. परिणामी ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक पारंपरिक चुलीच्या माध्यमातून स्वयंपाक करतात. मात्र सदर चुलीमुळे इंधन जास्त लागते. त्याचबरोबर धूर निघत असल्याने स्वयंपाक करणाऱ्या महिलेच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. पर्यावरणाची हानीही मोठ्याप्रमाणात होते. जंगलाची तोड करावी लागते.
या सर्वांवर उपाय म्हणून वन विभागाने ईको चूल निर्माण केली आहे. आलापल्ली वन विभागाच्या मार्फतीने या चुलीचे प्रदर्शन गावोगावी लावले जात असून नागरिकांना याबद्दलची माहिती दिली जात आहे. लहान ईको चुलीची किंमत २ हजार ५०० रूपये तर मोठ्या चुलीची किंमत ७ हजार ५०० रूपये आहे. एकदा थोडेफार पैसे खर्च होत असले तरी त्यामुळे होणाऱ्या बचतीमुळे नागरिकांचा फायदाच होणार आहे. आलापल्ली वन विभागातील वनरक्षक प्रभाकर आनकरी, सीनू आडे, वासुदेव घुगलोत व एकलव्य लोकसेवा संस्था आलापल्लीचे सदस्य गावोगावी जाऊन ईको चुलीबद्दलची माहिती देत आहेत. या चुलीचे उत्पादन वाढल्यानंतर सदर चूल खुल्या बाजारात नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सदर चूल अत्यंत फायद्याची ठरणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
अशा पद्धतीने ईको चूल होते कार्यान्वित
ही चूल बॅटरीवर चालत असून इंधन म्हणून पॅलेटस्चा वापर केला जातो. सदर पॅलेटस् पालापाचोळा, कृषी अवशेष, बायोमास यापासून बनविल्या जातात. १० रूपये किलो दराने वन विभागाच्या मार्फतीने सदर पॅलेटस् उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पॅलेटस् प्रदूषण विरहीत आहे. त्यातून धूर निघत नाही. एक किलो पॅलेटस्मध्ये चार ते पाच दिवसांचा स्वयंपाक तयार होऊ शकतो. म्हणजे दरदिवशीचा स्वयंपाकाचा खर्च केवळ दोन रूपये एवढा आहे.