उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अहेरीत भाजपसमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2015 04:03 IST2015-11-25T04:03:30+5:302015-11-25T04:03:30+5:30

पहिल्या टप्प्यात अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, धानोरा या पाच नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज

Due to not withdrawing the application for candidature, | उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अहेरीत भाजपसमोर पेच

उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने अहेरीत भाजपसमोर पेच

एटापल्लीत काँग्रेस उमेदवाराची माघार : अहेरी उपविभागात राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक नगराध्यक्ष मिळण्याची शक्यता
गडचिरोली : पहिल्या टप्प्यात अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, कोरची, धानोरा या पाच नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी अर्ज मागे घेण्याची मंगळवारी अखेरची मुदत होती. पालकमंत्र्यांचे वास्तव्य असलेल्या अहेरीत भाजपमध्ये आता खुली गटबाजी निर्माण झाली आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी भाजपच्या दोन्ही महिला उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने भाजपसमोरची डोकेदुखी आता वाढणार आहे.
राजनगरी अहेरीत नगर पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला १७ पैकी ९ जागा मिळून स्पष्ट बहूमत मिळाले होते. भाजपने नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडून हर्षा ठाकरे व प्राजक्ता पेदापल्लीवार या दोन नगर सेविकांचे अर्ज भरले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्चना विरगोनवार यांचाही उमेदवारी अर्ज दाखल होता. मंगळवारी यापैकी कुणीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आता भाजपात नगराध्यक्ष पदासाठी दोन उमेदवार मैदानात राहणार आहे. ठाकरे यांच्या कुटुंबातील सदस्य हे भाजपप्रणित मातृसंघटनांमध्ये वरिष्ठ पदावर काम करणारे जुने निष्ठावान कार्यकर्ते आहे तर पेदापल्लीवार हे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या कुटुंबाशी निगडीत असलेले आहेत. भाजपच्या सूत्रानुसार येथे नगराध्यक्ष पद हर्षा ठाकरे यांना दिल्या जाण्याची शक्यता होती. त्यामुळे पेदापल्लीवार यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आले. मात्र त्यांनी स्पष्ट नकार पालकमंत्र्यांकडे देत आपला अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे अहेरीत आता भारतीय जनता पक्षात उभी फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
तर अहेरी उपविभागात एटापल्ली येथे आज काँग्रेसच्या भारती मनिषा इष्टाम यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. याशिवाय सुनिता मोहन चांदेकर यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता प्रसाद राजकोंडवार व भाजपच्या निर्मला जयंद्र कोंडभत्तुलवार यांच्यात लढत आहे. येथे काँग्रेसने नगराध्यक्ष पद राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन उपाध्यक्ष पदासह तीन सभापती पद आपल्या पदरात पाडून घेतले, अशी माहिती आहे. सिरोंचा, भामरागड येथेही राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्ष पदावर दावा केला असून काँग्रेस सोबत आघाडी कायम ठेवण्याबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी पुढाकार घेतला आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अनेक तडजोडी करून पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या राजकारणाला शह देण्याची भूमिका घेतली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
कोरची येथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी हिरा राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. येथे शिवसेनेचे नसरूद्दीन भामानी व काँग्रेसचे शामलाल मडावी यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी लढत होईल. धानोरा व मुलचेरा येथे प्रत्येकी दोन उमेदवारांचे अर्ज दाखल होते. ते कायमच राहिले आहे. मुलचेरा येथे राष्ट्रवादी काँग्रेसला स्पष्ट बहुमत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Due to not withdrawing the application for candidature,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.