देसाईगंजमध्ये गरजेपेक्षा अपुरा पाणीपुरवठा
By Admin | Updated: May 10, 2014 00:11 IST2014-05-10T00:11:31+5:302014-05-10T00:11:31+5:30
प्रती व्यक्ती प्रती दिन १३५ लिटर पाण्याची आवश्यकता आहे. या शासनाच्या नियमाप्रमाणे देसाईगंज शहरातील ४० हजार लोकसंख्येला ...

देसाईगंजमध्ये गरजेपेक्षा अपुरा पाणीपुरवठा
देसाईगंज : प्रती व्यक्ती प्रती दिन १३५ लिटर पाण्याची आवश्यकता आहे. या शासनाच्या नियमाप्रमाणे देसाईगंज शहरातील ४० हजार लोकसंख्येला ५४ लाख लिटर पाण्याची आवश्यकता असताना केवळ ११ लाख ५० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. शासनाच्या नियमावर बोट ठेवल्यास देसाईगंज शहराला आणखी ४२ लाख ५० हजार लिटर पाण्याची गरज आहे. देसाईगंज येथे १९६१ मध्ये नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर १९६४ मध्ये ५ लाख लिटर पाण्याची क्षमता असलेली नळ योजना बांधण्यात आली. त्यावेळी शहराची लोकसंख्या केवळ ७ हजार ऐवढी होती. देसाईगंज हे जिल्ह्यातील मध्यवर्ती व औद्योगिक ठिकाण असल्याने या शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली. आज देसाईगंज शहराची लोकसंख्या ४० हजार एवढी आहे. प्रत्येक व्यक्तीला दिवसाला १३५ लिटर पाणी मिळावे, असा शासनाचा नियम आहे. त्यानुसार देसाईगंज शहराला ५४ लाख लिटर पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात केवळ ११ लाख ५० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. अजुनही ४२ लाख ५० हजार लिटरची टंचाई भासत आहे. आकडेवारीकडे नजर टाकल्यास लोकसंख्येच्या तुलनेत केवळ २५ टक्के पाण्याचा पुरवठा होत असल्याचे दिसून येते. विद्यमान पाणी पुरवठा व्यवस्थेत केवळ ८ हजार ५१८ नागरिकांच्या पाण्याची गरज पूर्ण करण्याची क्षमता आहे. मात्र याच पाण्यात ४० हजार लोकसंख्येला आपली गरज पूर्ण करावी लागत आहे. देसाईगंजमध्ये १० लाख ५० हजार लिटर पाणी क्षमता असलेल्या भगतसिंग वार्डामध्ये दोन पाण्याच्या टाक्या व जुनी वडसा परिसरात १ लाख लिटर क्षमतेची एक पाण्याची टाकी आहे. हेटी वार्ड येथे ५० हजार लिटर पाणी क्षमतेची टाकी मोळकडीस आली आहे. शहरात एकूण ३ हजार ७०४ नळ कनेक्शन आहेत. यामध्ये ३ हजार ५८२ कनेक्शन घरगुती तर १२२ कनेक्शन व्यावसायीक आहेत. नगर परिषद घरगुती नळधारकांकडून १२०० रूपये प्रती वर्ष कर आकारते. या माध्यमातून नगर परिषदेला ४४ लाख ४४ हजार ८०० रूपये एवढा पाणीपट्टी कर गोळा होतो. पाण्याशिवाय व्यक्ती जीवंत राहू शकत नाही. त्यामुळेच पाण्याला जीवनाची उपमा दिली जाते. नगर परिषद प्रशासनाला शासनाकडून कोट्यवधी रूपयाचा निधी प्राप्त होते. सदर निधी अनावश्यक कामांवर खर्च केल्या जातो. त्यापेक्षा पाणी पुरवठा योजनेवर खर्च केल्यास नागरिकांची तहाण भागण्यास मदत होईल. उन्हाळ्यामध्ये पाण्याचा वापर जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती उद्भवत असल्याने देसाईगंज शहरात पाण्यासाठी हाहाकार माजतो. पुरेशा प्रमाणत पाणी पुरवठा होण्यासाठी नळ योजना बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)