मुसळधार पावसाने पिकांना संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 01:30 IST2016-08-28T01:30:56+5:302016-08-28T01:30:56+5:30
भामरागड तालुक्यात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे धानपिकाला संजीवनी मिळाली आहे.

मुसळधार पावसाने पिकांना संजीवनी
शेतकरी सुखावला : भामरागड तालुक्यात दमदार पाऊस
भामरागड : भामरागड तालुक्यात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे धानपिकाला संजीवनी मिळाली आहे. त्याचबरोबर पर्लकोटा नदी भरून वाहत आहे. पुलाला पाणी टेकण्यास अगदी काही अंतर शिल्लक आहे.
जुलै महिन्यात झालेल्या दरमदार पावसामुळे भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांनी रोवणीचे कामे सुरू केली होती. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने धानाच्या बांधीमधील पाणी आटण्यास सुरूवात झाली होती. धानपीक करपण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला होता. हजारो रूपये खर्च करूनही पीक होणार की नाही, अशी शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात होती. मात्र भामरागड तालुक्यात शुक्रवारी रात्री दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पर्लकोटा नदी दुथडी वाहण्यास सुरूवात झाली. इंद्रावती नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे. काही शेतकऱ्यांचे पावसाअभावी रोवणीचे काम थांबले होते. अशा शेतकऱ्यांनी रोवणीच्या कामाला या पाण्यामुळे सुरूवात केली आहे. त्याचबरोबर ज्या तलावांमधील पाणी सोडण्यात आले होते. त्या तलावांमधील पाणी पातळीतही वाढ होण्यास मदत झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)