पुरामुळे मार्ग बंद
By Admin | Updated: September 9, 2014 00:21 IST2014-09-09T00:21:30+5:302014-09-09T00:21:30+5:30
सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ६०.१४ मिमीच्या सरासरीने ७३१.७ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील चार मार्गाची वाहतूक सोमवारी

पुरामुळे मार्ग बंद
६०.१४ मिमी पाऊस : भामरागडचा संपर्क तुटलेलाच
गडचिरोली : सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गडचिरोली जिल्ह्यात ६०.१४ मिमीच्या सरासरीने ७३१.७ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जिल्ह्यातील चार मार्गाची वाहतूक सोमवारी दुपारपर्यंत ठप्पच होती. या पावसामुळे मुलचेरा तालुक्यातील गोमणी गावात ४३ घरांची पडझड झाली आहे. येथील ४६ कुटुंबाना सुंदरनगर येथे हलविण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत गडचिरोली तालुक्यात ९३.६, धानोरा तालुक्यात १३४, चामोर्शी तालुक्यात ६०, मुलचेरा तालुक्यात ३१, देसाईगंज तालुक्यात १०५.३, आरमोरी तालुक्यात ६७, कुरखेडा तालुक्यात ९०, कोरची तालुक्यात १२.४, अहेरी तालुक्यात ३२.२, एटापल्ली तालुक्यात ३३.६, भामरागडमध्ये ३७, सिरोंचा येथे २५.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. कठाणी नदीला पूर आल्यामुळे गडचिरोली-नागपूर मार्गावरची वाहतूक रविवारच्या संध्याकाळपासून सोमवारी दुपारपर्यंत बंदच होती. त्यानंतर दुपारी ३ वाजता गडचिरोली-चंद्रपूर मार्ग खुला झाला. वैरागड-देलनवाडी मार्गही बंद झाला आहे. बोलेपल्ली मार्ग बंद झाला असून भामरागड-आलापल्ली मार्गावरची वाहतूक बंदच आहे. भामरागड तालुक्यातील १०० वर अधिक गावांचा संपर्क तुटलेला आहे. दिना नदीचा पूर ओसरल्याने आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू झाली. या संततधार पावसामुळे चामोशी तालुक्यात १७५ घरांची पडझड झाली आहे. या पडझडीत ७ लाख २० हजार ४८० रूपयाचे नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. येनापूर सर्कलमध्ये ६० घर पडले असून १ लाख ५० हजार ७८० रूपयाचे नुकसान झाले. घोट सर्कलमध्ये ६१ घरांची पडझड झाली असून २ लाख ३७ हजार ७०० रूपयाचे नुकसान झाले आहे. आष्टी सर्कलमध्ये ६ घरांची पडझड झाली असून ३६ हजाराची नुकसान आहे. चामोर्शी सर्कलमध्ये ३० घरांची पडझड झाली आहे. येथे १ लाख १८ हजाराचे नुकसान झाले. कुनघाडा सर्कलमध्ये १८ घरांची पडझड झाली आहे. तेथे ७८ हजार ६८० रूपयाचे नुकसान झाले आहे. या सर्व पडझडीचा पंचनामा तलाठ्यांनी केला असून चामोर्शी तहसील प्रशासनाला याबाबतचा अहवाल देण्यात आला आहे.
अहेरी येथील बेघर कॉलनी वार्ड क्रमांक ४ मधील नंदू झाडे यांच्या घरावरचे छत अतिवृष्टीमुळे उडाल्याने त्यांचे घरातील सामान पूर्णत: भिजले आहे. अहेरीचे तलाठी जल्लेवार यांनी मोक्कापंचनामा केला असून १ लाखाचे नुकसान झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. संततधार पावसामुळे अहेरीचा विद्युत पुरवठा ३२ तास बंद होता. तो सोमवारी पहाटे ३ वाजता पूर्ववत सुरू झाला. अहेरीतील काही भागातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करीत आंदोलन केले. यावेळी सरपंच गंगाराम कोडापे, सदस्य शैलेश पटवर्धन, नायब तहसीलदार किरमे, आत्राम यांनी नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या व नुकसानाबाबत सर्व्हे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यातील अनेक मार्ग खुले झाले. त्यामुळे काही भागातील वाहतूक सुरळीत झाली. परंतु वैनगंगा नदीला अलेल्या पुराचा दाब कायम होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)