कठड्यांअभावी पुलावर अपघाताचा धोका
By Admin | Updated: February 7, 2016 01:49 IST2016-02-07T01:49:43+5:302016-02-07T01:49:43+5:30
भामरागडजवळून वाहणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची तसेच रूंदीसुध्दा कमी आहे.

कठड्यांअभावी पुलावर अपघाताचा धोका
पर्लकोटावरील अरूंद पूल
भामरागड : भामरागडजवळून वाहणाऱ्या पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची तसेच रूंदीसुध्दा कमी आहे. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे या पुलावर संरक्षण कठडे उभारण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने या पुलावरून अपघात होण्याचा धोका आहे. पर्लकोटा नदीवर असलेला पूल अतिशय अरूंद आहे. त्यामुळे या पुलावरून मोठे एकच वाहन जाऊ शकते. बाजूला अतिशय कमी जागा राहत असल्याने दुचाकीस्वाराला आपला जीव धोक्यात घालून मार्गक्रमण करावे लागते. दुचाकी व चारचाकी वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वी पुलावर लोखंडी संरक्षण कठडे उभारले होते. मात्र हे कठडे पावसाळ्यादरम्यान पुराच्या पाण्यात वाहून गेले. काही चोरीला नेले. तेव्हापासून मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावर कठडे उभारणे बंद केले आहे. वाहतुकीदरम्यान होणारा धोका लक्षात घेऊन या पुलावर संरक्षण कठडे लावण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)