डॉक्टरांअभावी अहेरीतील रुग्णांची प्रचंड हेळसांड
By Admin | Updated: October 11, 2016 03:15 IST2016-10-11T03:15:42+5:302016-10-11T03:15:42+5:30
अहेरी उपजिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्णविभागातील रुग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरच आले नसल्याने

डॉक्टरांअभावी अहेरीतील रुग्णांची प्रचंड हेळसांड
अहेरी : अहेरी उपजिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्णविभागातील रुग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरच आले नसल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांना सोमवारी प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागला. रात्रपाळीचे कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांनाच पुन्हा सकाळी कर्तव्यावर यावे लागले.
दमट वातावरण असल्यामुळे अहेरी उपविभागातील बहुतांश गावांमध्ये तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे अहेरी उपजिल्हा रुग्णालय रुग्णांनी हाऊसफूल्ल आहे. अनेक रुग्णांना खाली गादीवर झोपून उपचार घ्यावा लागत आहे. ओपीडीमध्येसुद्धा दरदिवशी शेकडो रुग्ण येत आहेत. सोमवारी सकाळी ८ वाजेपासूनच शेकडो महिला व पुरूष रुग्ण अहेरी उपजिल्हा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागात दाखल झाले. चिट्टी काढून डॉक्टरांची वाट बघत होते. बाह्य रुग्ण विभागात डॉ. हकीम यांची ड्यूटी लावण्यात आली होती. मात्र ते रुग्णालयात हजरच झाले नाही. इतर दोन डॉक्टर आरोग्य शिबिरांसाठी बाहेरगावी गेले होते. सकाळी १० वाजूनही डॉक्टर रुग्णालयात न आल्याने काही रुग्णांनी रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून विचारणा केली. १० वाजेपर्यंत शेकडो रुग्ण वाट बघत होते. त्यानंतर दुपारी ११.३० वाजता डॉक्टर इशांत तुरकर यांना रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉ. तुरकर यांची रात्री ड्यूटी होती. रात्रभर जागून सकाळी घरी परत गेल्यावर पुन्हा त्यांना बोलविण्यात आले. डॉ. उमाटे हे सुद्धा वॉर्डात सेवा देत होते. या दोघांनीही बाह्य रुग्ण विभागातील रुग्ण तपासले. या डॉक्टरांना आंतररुग्ण विभाग, बाह्य रुग्ण विभागसुद्धा सांभाळावा लागला.
अहेरी उपजिल्हा रुग्णालयात मागील अनेक वर्षांपासून डॉक्टरांची निम्मी पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा भार वाढत चालला आहे. अहेरी उपजिल्हा रुग्णालय हे अहेरी उपविभागातील एकमेव मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा व मुलचेरा तालुक्यातील शेकडोे रुग्ण येतात. त्यामुळे या रुग्णालयात वर्षभर रुग्णांची गर्दी राहते.
लोकप्रतिनिधी रिक्तपदे भरण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी अनेकदा करण्यात आली असली तरी अजूनपर्यंत सदर पदे भरण्यात आली नाही. (प्रतिनिधी)
४दमट वातावरणामुळे अहेरी उपविभागातील बहुतांश गावांमध्ये तापाची साथ पसरली आहे. त्यामुळे अहेरी उपजिल्हा रुग्णालयासह तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्येही रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. अहेरीतील उपजिल्हा रुग्णालय हे सर्वात मोठे रुग्णालय असल्याने या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या शेकडोंच्या घरात राहते. त्यामुळे या ठिकाणची पदे भरणे आवश्यक आहे.