अनाथाला नाथ बनविण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST2020-02-29T06:00:00+5:302020-02-29T06:00:33+5:30
उच्च शिक्षित असलेल्या टिकले दाम्पत्याच्या संसारवेलीवर एक फूल उमलले होते. मात्र वर्षभरातच ते गळून पडले. यामुळे खचून न जाता मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी एक लहान मुलगा दत्तक घेतला. त्याचे नाव आयुष ठेवले. प्रा. कालिदास टिकले हे कढोली येथील तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक तर विद्या टिकले या कुरखेडा येथील शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या.

अनाथाला नाथ बनविण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण
प्रदीप बोडणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : प्रा. कालिदास टिकले व प्रा. विद्या टिकले (शेट्ट्ये) या दाम्पत्याने अनाथ असलेल्या आयुषला दवाखान्यातून दत्तक घेतले. त्यामुळे आयुषचे जीवन फुलायला लागले होते. मात्र टिकले दाम्पत्याचे देसाईगंज तालुक्यातील कसारी फाट्याजवळ कार अपघातात निधन झाले. त्यामुळे दत्तकपूत्र आयुषला पुन्हा अनाथाचे जीवन जगावे लागणार आहे. तसेच अनाथ असलेल्या आयुषला नाथ (मोठे ) बनविण्याचे टिकले दाम्पत्याने बघितलेले स्वप्न अपुरेच राहिले.
उच्च शिक्षित असलेल्या टिकले दाम्पत्याच्या संसारवेलीवर एक फूल उमलले होते. मात्र वर्षभरातच ते गळून पडले. यामुळे खचून न जाता मनाचा मोठेपणा दाखवत त्यांनी एक लहान मुलगा दत्तक घेतला. त्याचे नाव आयुष ठेवले. प्रा. कालिदास टिकले हे कढोली येथील तुकाराम कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक तर विद्या टिकले या कुरखेडा येथील शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. दोघेही पगारदार असल्याने लाखो रूपये वेतन घरी येत होते. लहानपणी अनाथाचे जीवन जगलेल्या आयुषच्या जीवनात सुख नांदायला लागले. आयुषला पोटच्या पोराप्रमाणे टिकले दाम्पत्याने जीव लावला होता. आयुषला खुप मोठे बनविण्याचे स्वप्न टिकले दाम्पत्याने बघितले होते. आयुष हा नागपूर येथे नवव्या वर्गात शिक्षण घेत आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर टिकले दाम्पत्य नागपूर येथेच स्थायीक होणार होते. तसेच आयुषला चांगल्या दर्जाचे शिक्षण देऊन त्याला मोठे करायचे होते. एका अनाथ बालकाला टिकले दाम्पत्याने आश्रय देऊन त्याला नाथ बनविण्याचा ध्यास घेतला होता. मात्र नियतीला हे मान्य नसावे. गुरूवारी टिकले दाम्पत्य कुरखेडावरून देसाईगंजकडे जात होते. दरम्यान त्यांच्या वाहनाला अपघात झाला. या अपघातात टिकले दाम्पत्याचे निधन झाले. त्यामुळे या दाम्पत्याने आयुषबाबत बघितलेले स्वप्न अपुरेच राहिले. आयुष हा केवळ १५ वर्षांचा आहे. जगाच्या व्यवहारात अजून रूढायचा आहे. अशा स्थितीत त्याचा असरा असलले दोघेही निघून गेल्याने आयुषचा पुढील प्रवास कष्टप्रद होणार आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळविली नोकरी
प्रा.कालिदास टिकले हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील रहिवासी होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत त्यांनी शिक्षण घेतले व प्राध्यापक पदाचीही नोकरी अतिशय परिश्रमाने मिळविली. आपण जो त्रास भोगला तो त्रास आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये, असे प्रा.कालिदास टिकले यांचे स्वप्न होते. मात्र निधनामुळे त्यांचे हे स्वप्नही अपुरेच राहिले. त्यांच्या अंत्ययात्रेला अलोट गर्दी उसळली होती.