ग्रामसेवकांची मानहानी करू नका
By Admin | Updated: February 13, 2015 01:44 IST2015-02-13T01:44:03+5:302015-02-13T01:44:03+5:30
विभागीय चौकशी न करता तसेच विभागीय प्रमुखांकडून तक्रार नसतानाही सामान्य नागरिकांकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलीस प्रशासनाकडून ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल होत आहेत.

ग्रामसेवकांची मानहानी करू नका
सिरोंचा : विभागीय चौकशी न करता तसेच विभागीय प्रमुखांकडून तक्रार नसतानाही सामान्य नागरिकांकडून प्राप्त तक्रारीच्या आधारे पोलीस प्रशासनाकडून ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल होत आहेत. यामुळे ग्रामसेवकांची मानहानी होत आहे. गावातील विकास कामे कशी करायची, असा प्रश्न ग्रामसेवकांच्या पुढे निर्माण झाला असल्याने ग्रामसेवकांच्या विरोधात विनाकारण होणारी कार्यवाही थांबवून ग्रामसेवकांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे साकडे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना तालुका शाखा सिरोंचाच्या शिष्टमंडळाने सिरोंचाच्या संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे घातले आहे.
ग्रामसेवक संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीवरून पोलीस, अधिकारी व कर्मचारी कुठल्याही प्रकारच्या चौकशीला न बोलाविता तसेच सूचनापत्र न देता अट्टल गुन्हेगाराप्रमाणे वाहनात बसवून ग्रामसेवकांना पोलीस ठाण्याच आवारात ठेवण्याचा प्रकार होत आहे. सिरोंचा तालुका नक्षलप्रभावीत असतानाही ग्रामसेवकांना चौकशीसाठी रात्रीच्या वेळेस ग्रामपंचायतस्थळी नेण्यात येत आहे. अशा वाईट अनुभवाला ग्रामसेवकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ग्रामसेवकांचे मनोबल खचले आहे. असेही संघटनेने म्हटले आहे.
निवेदन देताना जि. प. कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद फुलझेले, सरचिटणीस प्रदीप भांडेकर, सिरोंचा तालुकाध्यक्ष मंगेश वाळके, मंगरू मोगरकर, डी. ए. वायभसे, जी. डी. मडावी, आर. एम. बोरकुटे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)