चामोर्शी : राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्याने लोकांच्या सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. जिल्ह्यातील रेल्वे, उद्योग, सिंचन, आरोग्य व शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, तसेच शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी जिल्ह्याला विशेष पॅकेज देऊ, असे आश्वासन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. भारतीय जनता पार्टीच्यावतीने चामोर्शी येथे ना. सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली- चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. देवराव होळी, क्रिष्णा गजबे, चंद्रपूरच्या महापौर कांचर्लावार, माजी जि. प. अध्यक्ष रवींद्र ओल्लालवार, मनोज पालारपवार, पंकज पालारपवार, रामेश्वर सेलुकर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, आनंद भांडेकर, रेखा डोळस, लता कुमरे, पं. स. सभापती शशीबाई चिळंगे, उपसभापती केशव भांडेकर, विनोद आकनपल्लीवार, सतिश गोटमवार, विलास गण्यारपवार, अशोक पोरेड्डीवार, अब्बास बेग, मनिषा देवगडे, दिलीप चलाख, जैराम चलाख, साईनाथ बुरांडे, मांतेश श्रीरामे उपस्थित होते. दरम्यान ना. सुधीर मुनगंटीवार यांचा भाजपच्यावतीने खा. अशोक नेते यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सोयी- सुविधांसाठी विशेष तरतुद करून टप्प्या- टप्प्याने आरोग्य केंद्राची दुरूस्ती केली जाईल, तसेच महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांचा विकास केला जाईल, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याचा दौरा करून सर्वांगिण विकासासाठी विशेष पॅकेज योजना तयार केल्या जातील, असे आश्वासन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जनसामान्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. केंद्र व राज्यशासन जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्याला न्याय देण्यासाठी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्ध करेल, यात तिळमात्र शंका नाही, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी केले. शेतकरी, गोरगरीब जनतेसाठी चांगले दिवस आले आहेत, असे प्रतिपादन डॉ. होळी यांनी केले. आष्टी, आलापल्ली, घोट, चामोर्शी येथील नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्याला विशेष पॅकेज देणार
By admin | Updated: January 4, 2015 23:13 IST