जिल्ह्यातील ग्रामसभांमध्ये जलसंधारणाबाबत चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2015 01:35 IST2015-05-02T01:35:28+5:302015-05-02T01:35:28+5:30
महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाभरात ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्ह्यातील ग्रामसभांमध्ये जलसंधारणाबाबत चर्चा
गडचिरोली : महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाभरात ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी पहिल्यांदाच १ मेच्या ग्रामसभेत जलसंधारणाबाबत व्यापक चर्चा करण्यात आली.
राज्य शासनाने यावर्षीपासून संपूर्ण राज्यात जलयुक्त शिवार अभियान सुरू केला आहे. जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा दिन याचे औचित्य साधून प्रत्येक ग्राम पंचायतीने १ मे रोजी ग्रामसभा घेण्याचे निर्देश आहेत. यावर्षी १ मेच्या ग्रामसभांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची माहिती देण्यात आली. या योजनेत गावकऱ्यांचा सहभाग कशापद्धतीने वाढविता येईल, याबाबत चर्चा करण्यात आली. थेंबथेंब पाण्याची बचत करून गावपातळीवर पाण्याचा प्रश्न सोडविण्यास लोकसहभागाचा हातभार कसा महत्त्वाचा आहे, हे सांगण्यात आले. ग्रामसभेत पर्यावरण संतुलित ग्राम समृद्धी योजना, वृक्षसंवर्धन, सहा वर्षापर्यंतच्या वयोगटातील बालकांमधील मुला, मुलींचे प्रमाण, प्रधानमंत्री जनधन योजना, स्वच्छ भारत अभियान, तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवानाने होणारे घातक परिणाम आदी बाबतही माहिती देण्यात आली. या ग्रामसभेमुळे जलसंधारणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास फारमोठी मदत झाली आहे.
१ मेची ग्रामसभा विशेष ग्रामसभा मानल्या जाते. या कालावधीत शेतीची कामे संपलेली असल्याने सर्वाधिक हजेरी या ग्रामसभेला दिसून आली. नागरिकांमध्येही प्रचंड प्रमाणात उत्साह दिसून आला. काही गावच्या ग्रामसभा मात्र कोरमअभावी तहकूब कराव्या लागल्या. (नगर प्रतिनिधी)