अहेरीच्या आधार कार्ड केंद्रावर नागरिकांची गैरसोय
By Admin | Updated: July 16, 2015 01:59 IST2015-07-16T01:59:24+5:302015-07-16T01:59:24+5:30
येथील तहसील कार्यालयासमोर असलेल्या महाआॅनलाईन सेतू केंद्रातील आधार कार्ड केंद्रात नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याने गैरसोय होत आहे.

अहेरीच्या आधार कार्ड केंद्रावर नागरिकांची गैरसोय
प्रचंड गर्दी : प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
अहेरी : येथील तहसील कार्यालयासमोर असलेल्या महाआॅनलाईन सेतू केंद्रातील आधार कार्ड केंद्रात नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याने गैरसोय होत आहे. आधार कार्ड केंद्र संचालकाकडून पिण्याचे पाणी व प्रवेशद्वारासमोर छताची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
शासनाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आधार कार्ड आवश्यक केले आहे. तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. शिवाय बचत बँक खाते, गॅस सिलिंडर कनेक्शनसाठी आधार कार्ड लिंकिंग करणे आवश्यक आहे. आधार कार्डचे दिवसेंदिवस महत्त्व वाढत असल्याने नागरिक आधार कार्डाची नोंदणी करण्यासाठी अहेरीतील एकमेव आधार कार्ड केंद्रावर गेल्या अनेक दिवसांपासून गर्दी करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
शासनाने आता सर्व शाळांची माहिती सरल या आॅनलाईन प्रणालीत संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड क्रमांक आवश्यक केल्याने तालुक्यातील बहुतांश गावातील पालक आपल्या पाल्यांना घेऊन आधार कार्ड नोंदणीसाठी अहेरीच्या केंद्रावर गर्दी करीत आहेत. गर्दीमुळे शाळकरी मुलांना दिवसभर केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर उन्हात प्रतीक्षा करावी लागत असल्याने शाळकरी मुलांना प्रचंड त्रास होत आहे.
मोठ्या गावात नोंदणी केंद्र द्या
अहेरी तालुक्यात गावांची संख्या मोठी असून भौगोलिक क्षेत्रही मोठे आहे. अहेरी शहर वगळून तालुक्यात इतर कोणत्याही गावात आधार कार्ड केंद्र नसल्याने संपूर्ण तालुक्यातील नागरिक अहेरीच्या आधार कार्ड केंद्रावर गर्दी करीत आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पेरमिली, जिलमगट्टा, कमलापूर, बोरी, देवलमरी या मोठ्या गावांमध्ये आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आहे.