तीन वर्षांपासून अपंगांचा निधी अप्राप्त
By Admin | Updated: June 15, 2015 01:54 IST2015-06-15T01:54:47+5:302015-06-15T01:54:47+5:30
गाव पातळीवर विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ग्राम पंचायतीला शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीपैकी तीन टक्के निधी ...

तीन वर्षांपासून अपंगांचा निधी अप्राप्त
ग्रा. पं. ने दुर्लक्ष केल्याचा आरोप : हक्काच्या पैशासाठी होत आहे पायपीट
वैरागड : गाव पातळीवर विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ग्राम पंचायतीला शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीपैकी तीन टक्के निधी हा समाजातील अपंगांना सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता दिल्या जातो. परंतु २०११ पासून वैरागड ग्राम पंचायती अंतर्गत सदर निधी अपंगांना देण्यात आला नाही. अपंगांच्या हक्काच्या पैशाकरिता त्यांना पायपीटच करावी लागत आहे, असा आरोप अपंग जन परिसर संघाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी केला.
वैरागड येथील शंकर मंदिर परिसरात अपंग जन कल्याण परिसर संघाची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीला अंधत्व परिसर संघाच्या संयोजिका संगीता तुमडे, दिवाकर नारनवरे, सोमेश्वर नरूले, तुळशिदास उसेंडी, ऋषी नाकाडे, मुखरू नाकाडे, नानाजी लांजेवार, सुधाकर मडावी, मोतिराम धनकर, दारंभाबाई सावरकर, सोनाबाई सावरकर, सरूबाई ठापे उपस्थित होत्या.
अपंगांना ग्रा. पं. स्तरावरून प्राप्त होणारा निधी त्यांना त्वरित देण्यात यावा, याबाबत एकमताने ठराव पारित करण्यात आला. ग्रा. पं. ना अपंगांच्या कल्याणासाठी प्राप्त होणारा तीन टक्के निधी अपंगांच्याच सोयी- सुविधांसाठी वापरण्यात यावा, या मागणीसंदर्भात जि. प. सदस्य पूनम गुरनुले व स्थानिक ग्राम पंचायत प्रशासनाला पत्र पाठविण्यात आले. जिल्ह्यातील अनेक ग्राम पंचायतींना प्राप्त होणाऱ्या एकूण निधीपैकी तीन टक्के निधी अपंगांच्या कल्याणाकरिता खर्च करण्यासाठी दिला जातो. मात्र तो प्रामाणिकपणे खर्च केला जात नाही. (वार्ताहर)