कार्यकर्त्यांशी थेट संवाद हा दादासाहेबांचा स्थायिभाव

By Admin | Updated: July 26, 2015 02:42 IST2015-07-26T02:42:33+5:302015-07-26T02:42:33+5:30

२६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. नवा जिल्हा असला तरी रा. सु. उपाख्य दादासाहेब गवई ..

Direct Dialogue with the workers is the permanent residence of Dadasaheb | कार्यकर्त्यांशी थेट संवाद हा दादासाहेबांचा स्थायिभाव

कार्यकर्त्यांशी थेट संवाद हा दादासाहेबांचा स्थायिभाव

पाच वेळा गडचिरोलीला दिली भेट : कार्यकर्त्यांमध्ये जागवायचे नवी ऊर्जा
गडचिरोली : २६ आॅगस्ट १९८२ ला चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्हा अस्तित्वात आला. नवा जिल्हा असला तरी रा. सु. उपाख्य दादासाहेब गवई यांचा गडचिरोलीशी नेहमीच स्रेहसंबंध राहिला. या मागास जिल्ह्याच्या विकासाची कायम तळमळ होती. त्यामुळे या भागातील शेकडो कार्यकर्त्यांशी नेहमीच संवाद साधण्यासाठी ते उत्सुक राहायचे.
या भागातला कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता दादासाहेबांना भेटला तर ते त्याची आस्थेवाईक चौकशी करीत. जिल्हा निर्मितीनंतर ते १९८४ ला पहिल्यांदा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने आयोजित जाहीर सभेसाठी गडचिरोलीला आले होते. स्थानिक इंदिरा गांधी चौकात दादासाहेबांची ही जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना अत्यंत आवेशपूर्ण मार्गदर्शन केले, अशी माहिती रिपाइं (गवई गट) चे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. त्यानंतर १९८९ मध्ये गडचिरोलीच्या श्री मंगल कार्यालयात कार्यकर्ता मेळाव्यासाठी दादासाहेब पुन्हा आलेत. त्यावेळीही त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. जातीयवादी शक्तीचा विरोध करा, असा सरळ नारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्यानंतर १९९६ ला रात्रीच्या वेळी त्यांनी इंदिरा गांधी चौकात कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन केले.
२००२ मध्ये नगर परिषदेची आचारसंहिता लागलेली होती. परंतु दादासाहेबांचा दौरा हा पूर्वनिश्चित असल्याने त्यांचा कार्यक्रम गडचिरोलीत घ्यायचा होता. मग यावर तोडगा म्हणून हा कार्यक्रम तत्कालीन खा. नरेश पुगलिया यांनी नवेगाव परिसरात घेण्याचे सूचविले. या कार्यक्रमालाही दादासाहेब उपस्थित झाले व त्यांनी काँग्रेस, रिपाईच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचे निश्चित झाले. या पुतळा उभारणी कामाचे भूमिपूजन दादासाहेबांच्या हस्ते पार पाडण्यात आले. विशेष बाब म्हणजे या पुतळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला दादासाहेब आवर्जुन उपस्थित होते. यावेळी तत्कालीन केंद्रीय मंत्री दिवंगत माधवराव सिंधिया हे ही आले होते. या कार्यक्रमाला त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षाशी असलेली दादासाहेबांची नाळ कधीही गडचिरोली जिल्ह्यात तुटली नाही. वेळोवेळी त्यांनी पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून मला सर्व अधिकार देऊन या भागात रिपाईची चळवळ मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन केले, असे अ‍ॅड. मेश्राम यांनी सांगितले. राज्यपाल असतानाही दादासाहेबांचा गडचिरोली जिल्ह्यात दौरा झाला. दादासाहेबांचा कायम जिव्हाळा या भागाशी राहिलेला आहे. देशातील मागास भागासोबतच गडचिरोली परिसरातील भूमीहिन लोकांना पट्टे वितरित झाले पाहिजे, यासाठी त्यांनी १९६४ पासून आक्रमक भूमिका घेतली. रिपाइंच्या माध्यमातून सरकारविरोधात आंदोलन करण्यासाठीही ते कधी डगमगले नाही. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनाही त्यांनी त्याच भूमिकेतून मार्गदर्शन केले. दादासाहेबांच्या या स्रेहबंधामुळे आपल्याला १९८२ पासून गडचिरोली जिल्हा रिपाइंचे अध्यक्षपद मिळाले, ते आजगायत कायम आहे. दादासाहेबांच्या निघून जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली असून गडचिरोली जिल्ह्याप्रती जिव्हाळा ठेवणारे एक मोठे नेतृत्त्व काळाच्या पडद्याआड गेले, अशी भावना अ‍ॅड. मेश्राम यांनी व्यक्त केली आहे.
नागपूर येथील दीक्षा भूमीच्या विकासातही दादासाहेबांचा मोलाचा वाटा राहिला आहे. दरवर्षी विजयादशमीला त्यांचे मार्गदर्शन शेकडो भीमसैनिक व तरूणांसाठी प्रेरणादायी ठरणारे होते. आता या मार्गदर्शनाला कायमचा विराम दादासाहेबांच्या जाण्याने मिळणार आहे. आता पुन्हा त्यांचे भाषण ऐकता येणार नाही. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Direct Dialogue with the workers is the permanent residence of Dadasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.