नंदीगाव येथील उपकेंद्रासाठी इमारत जीर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:36 IST2021-02-13T04:36:22+5:302021-02-13T04:36:22+5:30
झिंगानूरवासीयांना प्रवासाचा आर्थिक भुर्दंड झिंगानूर : झिंगानूरच्या ३० किमी परिघातात पातागुडम, रायगुडम, पेंडालाया, आसरअल्ली, देचलीपेठा, रामपल्ली, अमडेली, चिटुर, अंकिसा ...

नंदीगाव येथील उपकेंद्रासाठी इमारत जीर्ण
झिंगानूरवासीयांना प्रवासाचा आर्थिक भुर्दंड
झिंगानूर : झिंगानूरच्या ३० किमी परिघातात पातागुडम, रायगुडम, पेंडालाया, आसरअल्ली, देचलीपेठा, रामपल्ली, अमडेली, चिटुर, अंकिसा आदी गावे येतात. झिंगानूरपासून पातागुडम ३० किमी, आसरअल्ली २६ किमी, देचलीपेठा व रोमपल्ली २५ किमी, तसेच अमडेली, चिटूर, अंकिसा ३० किमी अंतरावर येतात. याशिवाय परिसरात बरीच गावे आहेत. सिरोंचा तालुका मुख्यालयी येण्यासाठी नागरिकांना ५० ते ६० किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसतो. झिंगानूर तालुका घोषित करून न्याय देण्याची मागणी आहे.
नदी पात्रातील शेतीवर कारवाई करा
गडचिरोली : नदीपात्रात भाजीपाला पिकांची लागवड करतात. भाजीपाल्यावर विविध पिकांची फवारणी केली जाते. त्यामुळे प्रदूषण होत असल्याने लागवडीवर बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कढोलीत फुलली मक्याची शेती
कुरखेडा : तालुक्यातील कढोली परिसरातील शेतकरी आता रब्बी हंगामातील पिके घेण्यास प्राधान्य देत आहे. मका, हरभरा, भुईमूग, भाजीपाला अशी विविध पिके घेत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर उन्हाळी धानपिकाची लागवड केली आहे. रब्बी पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास फार मोेठी मदत झाली आहे.
महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्याची मागणी
आरमोरी : पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आरमोरी येथील प्राचीन महादेवगड आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे, परंतु आरमोरी येथील प्राचीन महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला नाही. महाशिवरात्रीनिमित्त महादेवगडावर भाविकांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोईसुविधा मिळणे आवश्यक आहे. शासनाने लक्ष घालून महादेवगडाचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अनेक पांदण रस्ते खडीकरणाच्या प्रतीक्षेत
गडचिरोली : तालुक्यातील अनेक गावांतील शेतशिवारात जाणाऱ्या पांदण रस्त्यावर पावसाळ्यात चिखल पसरत असतो. मरेगाव येथील शेतकऱ्यांच्या मागणीनंतर आठ वर्षांपूर्वी मातीकाम करण्यात आले, परंतु अद्यापही या मार्गाचे खडीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांना चिखलातूनच वाट काढावी लागते. मरेगाव-चांभार्डा शेतशिवाराकडे जाणाऱ्या रस्त्याचे अंतर जवळपास तीन किमी आहे. या मार्गावर मध्यंतरी एक ते दीड किमीचा फाटा आहे. दोन्ही मार्गांवर एकाच वर्षी मातीकाम करण्यात आले. त्यानंतर, दोन वर्षांनी या मार्गावर मुरुम टाकण्यात आले, परंतु आठ वर्षांचा कालावधी उलटूनही खडीकरण झाले नाही. पावसाळ्यात या मार्गावरून चिखल पसरत असतो.
मुरमाडी परिसरात कव्हरेजची समस्या
गडचिरोली : तालुक्यातील मुरमाडी परिसरात काही दिवसांपासून बीएसएनएल सेवा विस्कळीत होत आहे. त्यामुळे परिसरातील ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. अमिर्झा येथे बीएसएनएल सेवेचे टॉवर असूनही निरुपयोगी ठरत आहे. सेवा विस्कळीत होत असल्याने, परिसरातील नागरिकांना विविध ऑनलाइन कामे करताना अडचणी येत आहेत.